२१ फेब्रुवारीपासून देहलीमध्ये चालू होत असलेल्या ‘९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या निमित्ताने…
२१ ते २३ फेब्रुवारी या काळात ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देहलीत होत आहे. मराठी भाषेला ‘अभिजात (समृद्ध) भाषेचा दर्जा’ मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद़्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘कोकणातील साहित्यिक वाटचाल’ यावर विशेष लेख येथे देत आहे.
१. कोकणातील कोणत्याही चळवळींचा प्रभाव महाराष्ट्रात होणे
महाराष्ट्राच्या अन्य विभागांप्रमाणेच एक विभाग म्हणजे कोकण ! या कोकणात वेधक निसर्गसौंदर्य, भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण लाभलेला समुद्रकिनारा, विविध झाडे – झुडुपे, डोंगर – दर्या अशा अनेक नयनरम्य नैसर्गिक साधनसंपत्ती आढळतात. त्यामुळे इतर विभागांप्रमाणेच कोकणचे वेगळे महत्त्व आहे. त्यासह कोकण हा महाराष्ट्रातील समृद्ध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्नता लाभलेला प्रदेश आहे. त्याचे कारण म्हणजे याच कोकणात अनेक चळवळींचा प्रारंभ झाला आहे. त्यामुळे त्या त्या चळवळींचा मोठा प्रभाव हा कोकणासह महाराष्ट्रात झाला. त्यामुळे कोकणातील सर्वच क्षेत्रांची वाटचाल अत्यंत लक्षणीय आहे. एवढेच नव्हे, तर अन्य चळवळींप्रमाणेच येथील साहित्यिक चळवळीचा इतिहास मोठा आहे आणि त्याला विविध साहित्य प्रकार अन् प्रसिद्ध साहित्यिक यांची पार्श्वभूमी आहे. म्हणूनच कोकणातील साहित्यिक चळवळ ही कालही प्रभावी होती, आजही लक्षणीय आहे आणि भविष्यातही तिचे योगदान मोठे असणार आहे.
२. कोकणातील साहित्यिक वाटचाल पारंपरिक आणि आधुनिक विचारांचे मिश्रण
कोकणात नमन, जाखडी, लोककथा, ओव्या आणि भारुडे मोठ्या प्रमाणावर प्रचलित होती अन् कालानुरूप आजही त्यांचे अस्तित्व भक्कम आहे. ‘दशावतारी नाट्य’प्रकारही येथील लोकसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या साहित्याच्या माध्यमातून कोकणातील अनेक प्रथा, परंपरा, सण आणि उत्सव यांचे महत्त्व अधोरेखित झाले. आजही ग्रामीण भागात वरील प्रकारातून साहित्य निर्मिती आणि सामाजिक परिवर्तन होण्याची प्रक्रिया चालू असल्याचे दिसून येते. मुख्यतः लोककथा, ओवी, भारुडे, कविता, कथा, कादंबरी आणि नाटके यांमधून व्यक्त झाली आहे; म्हणूनच कोकण हा केवळ निसर्गरम्य प्रदेश नसून तो मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेत महत्त्वाचे योगदान देणारा भाग आहे. कोकणातील साहित्यिक वाटचाल लोकपरंपरेपासून आधुनिक साहित्यापर्यंत विविध टप्प्यांतून गेली आहे; म्हणूनच कोकणातील साहित्यिक चळवळ ही पारंपरिक आणि आधुनिक विचारांचे मिश्रण आहे. लोकसाहित्य, कविता, कथा आणि नाट्य या सर्व माध्यमांतून कोकणाने मराठी साहित्य समृद्ध केले आहे.
३. कोकणात उदयास आलेले नामवंत साहित्यिक
कोकणातून अनेक नामवंत साहित्यिक उदयास आले, ज्यांनी मराठी साहित्याला मोठे योगदान दिले. कृ.आ. केळुस्कर यांनी गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले चरित्र स्वखर्चातून लिहिले अन् त्यातून साहित्य चळवळ प्रवाहित केली. कवी केशवसुत यांना आधुनिक मराठी कवितेचे प्रवर्तक मानले जाते. त्यांनी त्यांच्या कवितांच्या माध्यमातून खर्या अर्थाने लोकांच्या मनातील अंधश्रद्धा, अज्ञान आणि अनिष्ट प्रथा यांवर प्रहार करतांना मानवतेचा अन् सामाजिक जाणिवा वृद्धींगत करणारा आशय मांडला. त्यापुढील धनंजय कीर यांच्यासारख्या चरित्र लेखकांनी भारतातील अनेक नामवंत आणि महनीय व्यक्तीमत्त्वाची चरित्रे निर्माण केली. साहित्य क्षेत्रातील सर्वांत मोठा समजला जाणारा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेते वि. स. खांडेकर, भारतरत्न डॉ. पा.वा. काणे, ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, कथाकार जी.ए. कुलकर्णी, महेश एलकुंचवार यांसारखे कादंबरीकार, लेखक आणि नाटककारही कोकणातील आहेत. त्यांच्यामुळे खर्या अर्थाने साहित्य चळवळ समृद्ध झाली. जयवंत दळवी आणि अन्यांनी नाट्यलेखन अन् विविध क्षेत्रांत लेखन करतांना त्या त्या लेखनाचा आशय समाजमनाला भावणारा ठेवला. त्यामुळे संवेदनशील असणारे कोकणी समाजमन या लेखनाकडे आकर्षित झाले. परिणामी कोकणात साहित्यिक चळवळ ही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली.
४. कोकणात होत असलेली साहित्य संमेलनाची घोडदौड
अशा असंख्य लेखकांनी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित, वंचित आणि सर्वसमावेशक कोकणी मनाला भुरळ घातली. प्रत्येकाच्या लेखणीच्या आशय संपन्न लेखनामुळे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत साहित्याची आवड निर्माण झाली. त्याचा परिणाम, म्हणजे कोकणात अनेक साहित्य संमेलने यशस्वी झाली. रत्नागिरी येथे वर्ष १९९० मध्ये झालेल्या साहित्य संमेलनानंतर तत्कालीन संमेलनाध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’ची स्थापना केली आणि तेव्हापासून आजपर्यंत कोकणातील वाडी-वस्त्यांमधील संवेदना जपणार्या मनांनी लिहायला प्रारंभ केला. त्याचा परिणाम म्हणजे अनेक कवी, लेखक, कथाकार, कादंबरीकार, ललित लेखन करणारे साहित्यिक सिद्ध झाले. त्यातून त्यांच्याच पुढाकाराने कोकणात विविध साहित्य संमेलने भरवली जात आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने कोकणात झाली. त्यासह कोकण मराठी साहित्य परिषदेची १७ पेक्षा अधिक केंद्रीय संमेलने, साहित्य विश्वात पहिल्यांदाच ६ राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलने, राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन, बाल साहित्य संमेलन यांसह स्थानिक स्तरावर अनेक संमेलने झाली. त्यात राजापूर येथे ग्रामीण साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलन यांचे प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते. त्यात कोकणी भाषा आणि साहित्य चळवळ यांवर मोठ्या प्रमाणात चर्चा घडवून आणली जाते. महिला साहित्य संमेलन असो वा युवा साहित्य संमेलन असो यांतून महिला आणि युवा वर्गाच्या समोर असणार्या प्रश्नांना आवाज असतो. त्यामुळे या साहित्य संमेलनांना उपस्थितीही मोठी असते.
काळाच्या ओघात कोकणातील असंख्य नवलेखक स्वत:च्या सृजनशील लेखणीद्वारे आता कादंबरी, कविता, लघुकथा, वाहिन्यांवरील मालिकांचे लेखन, संहिता लेखन आणि चित्रपट कथा या माध्यमांतून योगदान देत आहेत. कोकणावर आधारित पर्यटन, विज्ञान, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कथा लोकप्रिय होत आहेत. जुन्या आणि नवीन लेखकांनी कोकणातील संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवून लेखन केले आहे.
५. मराठी भाषेचे ‘अभिजात’पण जपण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
काही दिवसांपूर्वी मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा प्राप्त झाला. मागील कितीतरी वर्षांपासून चालू असलेली साहित्यिक आणि मराठी भाषिकांची मागणी विद्यमान सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे पूर्ण झाली. त्यामुळे आता सर्वच मराठी भाषिकांनी मराठी भाषेचे ‘अभिजात’पण जपण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या प्रयत्नांना हातभार लावण्यात कोकणचे मोठे योगदान असेल. यावर्षी देहलीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे, हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
थोडक्यात अनेक थोर लेखकांच्या पदस्पर्शाने कोकणची भूमी पावन झालेली आहे. त्या भूमीत ज्या अपेक्षेने मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ उभारली त्याच जोमाने ती पुढे पुढे जात आहे. अनेक संस्था यासाठी पुढाकार घेऊन भडकत्या प्रसारमाध्यमांच्या काळात तरुण मनाला लिहिते करत आहेत. त्यामुळे कोकणातील साहित्यिक वाटचाल ही आव्हानात्मक जरी असली, तरी समाधानकारक आहे.
– श्री. माधव विश्वनाथ अंकलगे, वाटद खंडाळा, जिल्हा रत्नागिरी. (१८.२.२०२५)
संपादकीय भूमिकाआजच्या तंत्रज्ञानाच्या काळात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी समाजात वाचन संस्कृती रूजवणे आवश्यक ! |