रत्नागिरी येथे रा.स्व. संघाच्या संचलनाच्या वेळी मुसलमानांनी घोषणा दिल्याच्या घटनेचा मालवण शहरात हिंदूंकडून निषेध

  • मालवण तालुक्यात अशा घटना घडू नये, यासाठी सतर्क रहाण्याचे पोलिसांना आवाहन

  • बघ्याची भूमिका घेणार्‍या रत्नागिरी पोलिसांचा केला निषेध !

मालवण – रत्नागिरी येथे ११ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाच्या वेळी मुसलमानांनी ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे.) घोषणा दिल्याच्या घटनेचे मालवण येथे पडसाद उमटले असून येथे हिंदूंच्या वतीने वाहनफेरी काढून या घटनेचा निषेध केला.  रत्नागिरी पोलिसांनी ही घटना रोखण्यासाठी वेळीच प्रयत्न न करता बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप करून त्यांचाही निषेध या वेळी करण्यात आला. ‘मालवण शहरात सध्या गोल टोपी घातलेल्या अनोळखी व्यक्तींचा संशयास्पद वावर वाढला आहे. त्यामुळे हिंदूंच्या उत्सवामध्ये हेतूपुरस्सर विघ्न निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून चालू नाही ना ? याची माहिती काढावी आणि भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी सतर्क रहावे’, असे निवेदन या वेळी पोलिसांना देण्यात आले.

शहरात वाहन फेरी काढण्यापूर्वी मेढा येथील मौनीनाथ मंदिरात हिंदूंची बैठक झाली. त्यानंतर मंदिर ते पोलीस ठाण्यापर्यंत वाहनफेरी काढून प्रभारी (तात्पुरता कार्यभार) पोलीस निरीक्षक भरत धुमाळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदूंनी ‘भारतमाता की जय’, ‘वन्दे मातरम्’ आदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. कोकणनगर, रत्नागिरी परिसरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन जाणार आहे, याची पोलिसांना पूर्ण माहिती होती आणि पोलीस फौजफाटासुद्धा मोठ्या प्रमाणात तेथे होता, तरीही पोलिसांनी मुसलमानांच्या जमावाला एकत्र येऊ दिले. संचलन तेथे पोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला नाही. पोलिसांनी मुक्याची भूमिका घेतल्याने जमावाची धाडस वाढले. त्यामुळे त्या जमावाने संचलन रोखण्याचा प्रयत्न करण्यासह ‘नारा-ए- तकबीर’, ‘अल्लाहू अकबर’, अशा घोषणा दिल्याने तणाव निर्माण झाला.

२. मुसलमान समाजातील काही समाजकंटकांच्या उद्दामपणामुळे तो प्रकार घडला असला, तरी रत्नागिरी पोलिसांची भूमिका ही अत्यंत आक्षेपार्ह आहे. ‘प्रत्यक्ष हाणामारी घडू दिली नाही’, असे दाखवून त्याचे श्रेय घेण्याचा पोलिसांना कोणताही अधिकार नाही.

३. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. अशा स्थितीत मुद्दामहून जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी करत नाहीत ना ? यादृष्टीने सुद्धा चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्हा सर्व हिंदूंच्या भावना कोकण पोलीस आयुक्तांपर्यंत पोचवाव्यात.

….त्यांचे धाडस मोडून काढण्याचे काम येत्या काही दिवसांत होईल ! – नितेश राणे, आमदार

आमदार नितेश राणे

ज्यांनी ज्यांनी अल्लाहू अकबर घोषणा दिल्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्रभक्त संघटनेचे संचलन थांबवण्याचे धाडस कोण करत असेल, तर त्यांचे हे धाडस मोडून काढण्याचे काम येणार्‍या दिवसांत होईल. त्यांच्या जिभा अशा छाटून टाकू की, पुन्हा अल्लाहू अकबर हे नाव तोंडावर येणार नाही, अशी चेतावणी भाजपचे प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे यांनी कोकणनगर, रत्नागिरी येथील घटनेशी संबंधित धर्मांधांना दिली. याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलतांना आमदार राणे यांनी ही चेतावणी दिली.