अक्षय शिंदेचा अंत्यसंस्कार अखेर उल्हासनगरमध्ये

उल्हासनगर – बदलापूर येथील अल्पवयीन विद्यार्थिनींवरील बलात्कारीत आरोपी अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यावर त्याच्या अंत्यसंस्कारांना ७ दिवस होऊनही स्थानिक जनतेच्या विरोधामुळे जागा मिळत नव्हती. शेवटी उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीमध्ये त्याचे दफन करण्यासाठी खड्डा खणण्यात आला होता; मात्र स्थानिक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी खड्डा बुजवला अन् अंत्यसंस्काराला विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी विरोध करणार्‍यांना पकडले आणि त्यानंतर अक्षयचा मृतदेह दफन करण्यात आला.

अक्षय शिंदेच्या पालकांनी त्याला दफन करण्यासाठी जागा मिळण्यासाठी न्यायालयात याचिका केली होती. त्यानंतर न्यायालयाने ‘त्याचे दफन करण्यास जागा द्यावी’, असे निर्देश दिले होते.

आरोपीने गोळीबार केल्यावर बंदूक काय दिखाव्यासाठी ठेवायची का ? – मुख्यमंत्री

आरोपी गोळीबार करतो, तेव्हा पोलिसांनी बंदूक काय दिखाव्यासाठी (‘शो’साठी) ठेवायची का ? आरोपीवर गोळीबार केला नसता, तर ‘का केला नाही ?’ असेही लोकांनी विचारले असते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.