कोलकाता (बंगाल) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. ऐन्द्री देबनाथ (वय ७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. ऐन्द्री देबनाथ ही या पिढीतील एक आहे !

‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. ऐन्द्री देबनाथ महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२.८.२०२४)

कु. ऐन्द्री देबनाथ
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. मागील एक वर्षात ऐन्द्रीमध्ये वाढलेले गुण

इतरांचा विचार करणे, साहाय्य करणे, परिस्थिती स्वीकारणे हे गुण कु. ऐन्द्रीमध्ये वाढले आहेत.

२. साधनेची तळमळ वाढणे

ऐन्द्रीची साधनेची तळमळ वाढली आहे. ती स्नान झाल्यावर घरातील देवतांची पूजा करून शाळेत जाते.

३. प्रतिदिन होणारे साधनेचे प्रयत्न

अ. ऐन्द्रीची शाळा सकाळची असल्याने तिला लवकर उठावे लागते. त्यामुळे ती शाळेतून परत आल्यावर झोपते; परंतु ती नामजप करत असेल, तर तिचे लक्ष नामजपातच असते. नामजप करतांना तिला झोप येत नाही.

आ. जर एखादा चांगला प्रसंग घडला, शाळेत कौतुक झाले किंवा चांगले गुण मिळाले, तर ती लगेच गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञताव्यक्त करते.

इ. तिच्याकडून चूक झाल्यास ती लगेचच कान पकडून क्षमायाचना करते.

४. राष्ट्राभिमान

एकदा शाळेच्या चारचाकीतून ती घरी परत येत असतांना तिला एके ठिकाणी तिरंगा पडलेला दिसला. बालसंस्कारवर्गात सांगितल्याप्रमाणे तिला वाटले की, तिरंगा उचलला पाहिजे; परंतु चालकाने तिला गाडीतून खाली उतरण्यास नकार दिला. घरी आल्यावर ‘रस्त्यात पडलेला तिरंगा उचलता आला नाही’, याचे तिला वाईट वाटले. हा प्रसंग घडल्यानंतर कितीतरी दिवस ती त्याविषयी बोलत राहिली आणि योग्य कृती न केल्याची तिला खंत वाटत राहिली.

५. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती भाव

ऐन्द्रीचा लहान भाऊ सप्तर्षि एकदा पलंगावर बसून खेळत होता. खेळता खेळता तो एकदम पलंगाच्या कडेला आला आणि पडणार होता, तेवढ्यात मी त्याला उचलले. त्या वेळी ऐन्द्रीला वाटले, ‘गुरुदेवांनीच आईच्या माध्यमातून तिच्या भावाला पडण्यापासून वाचवले’ आणि तिला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

६. स्वभावदोष

अव्यवस्थितपणा, आळस

७. वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

अ. ऐन्द्रीला मधून मधून सुगंध येतो.

आ. कधी कधी तिला श्रीकृष्णाच्या बासरीचा आवाज ऐकू येतो.

– सौ. अर्पिता देबनाथ (कु. ऐन्द्री हिची आई), कोलकाता, पश्चिम बंगाल. (५.३.२०२४)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक