भारताच्या विकासाला नवी दिशा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान म्हणून पदावर बसले आहेत. ३ वेळा मुख्यमंत्री पदावर बसणारे आणि नंतर ३ वेळा पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी भारतातील एकमेव राजकारणी आहेत. विशेष म्हणजे मोदी आमदारकीची निवडणूक न लढवता थेट मुख्यमंत्रीपदी बसले आणि खासदार झाल्यावर थेट पंतप्रधान पदावर त्यांना बसवण्यात आले. देशात असे अन्य कुणीही झालेले नाही. राजीव गांधी थेट पंतप्रधान झाले होते; मात्र ते पुढच्या वेळी पुन्हा पंतप्रधान होऊ शकले नव्हते. मोदी यांच्या या यशाचा अभ्यास करणे आवश्यक आहे; कारण केवळ विकास आणि करिश्मा (चमत्कार) असला, म्हणजे जनता मत देते, असे होत नाही, तर जनतेचा विश्वास प्राप्त करणे सर्वांत महत्त्वाचे असते अन् तो विश्वास पंतप्रधान मोदी यांनी प्रथम पक्षाचा, नंतर मुख्यमंत्री म्हणून गुजरात राज्याचा आणि आता पंतप्रधान म्हणून देशातील जनतेचा संपादन केला आहे. इतकेच नव्हे, तर विदेशात रहाणारे भारतीय आणि अनेक विदेशी नागरिक, राष्ट्रप्रमुखही मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करू लागले आहेत. आतापर्यंतच्या लेखात आपण ‘मोदी यांचे ५३ वर्षांचे सार्वजनिक जीवन, हिंदु धर्माला पुनर्प्रतिष्ठा मिळवून देणारे संन्यस्तवृत्तीचे पहिले प्रखर हिंदुत्वनिष्ठ पंतप्रधान, मोदी यांनी पंतप्रधानपदी आल्यावर विविध क्षेत्रांत केलेले कार्य’ यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/801916.html

पंतप्रधान नरेंद्र मोदी

४. मोदी यांनी पंतप्रधानपदी आल्यावर विविध क्षेत्रांत केलेले कार्य !

४ ऊ २. हमास-इस्रायल युद्ध : काँग्रेसच्या काळात भारताने कधीच इस्रायलचे समर्थन केले नाही किंवा कोणत्याही पंतप्रधानाने इस्रायलला भेट दिली नाही. पंतप्रधान मोदी यांनी हे पालटले आणि ते इस्रायलला गेले. गेल्या काही मासांपासून चालू असलेल्या हमास-इस्रायल युद्धात भारताने म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी थेटच इस्रायलचे समर्थन केले. असे गेल्या ७५ वर्षांत कधीच झाले नव्हते.

४ ऊ ३. ‘जी-२०’ : भारताने वर्ष २०२३ मध्ये ‘जी २०’ परिषदेचा अध्यक्ष या नात्याने नवी देहलीत बैठक आयोजित केली होती. (‘जी २०’, म्हणजे १९ देश आणि युरोपियन युनियन (यात २७ देश आहेत) यांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर यांची संघटना.) यासाठी ज्या सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या, त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या होत्या. केवळ या परिषदेचे सदस्य २० देशच नव्हे, तर भारताने आणखी काही देशांना यात निमंत्रित केले होते. भारताच्या प्रयत्नामुळे आफ्रिकेतील देशांच्या संघटनेला याचे सदस्य करून घेण्यात आले.

त्यामुळे या देशांमध्ये भारताविषयी मोठा आदर दिसून आला. या आयोजनामुळे पंतप्रधान मोदीच नव्हे, तर देशाचे जागतिक स्तरावर कौतुक झाले. भारत अशा बैठकीचे आयोजन इतक्या चांगल्या प्रकारे करू शकतो, हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.

श्री. प्रशांत कोयंडे

४ ऊ ४. चीन : चीन काँग्रेसच्या काळात आक्रमक होता. त्याला काँग्रेसने कधी रणांगणावर किंवा चर्चेच्या पटलावर ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही. मोदी यांनी हा पालट केला आणि त्यामुळेच आज चीन भारताला वचकून आहे. भारताने चीनला घेरण्यासाठी अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा एक गट निर्माण केला. या देशांच्या नौदलांकडून एकमेकांना साहाय्य करण्याचे मान्य केले. यामुळे चीनला समुद्रात आव्हान निर्माण करण्यात भारताला यश मिळाले. अमेरिकेशी भारताने चीनच्या धोक्यावरून जवळीकता साधली आणि अमेरिकेलाही ती हवी होती, हे प्रत्यक्षात कृतीतून दिसून आले.

४ ऊ ५. अमेरिका : पंतप्रधान मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला होता; मात्र मोदी पंतप्रधान झाल्यावर याच अमेरिकेने मोदी यांना पायघड्या घातल्या. भारतासारख्या मोठ्या देशाच्या पंतप्रधानाला अमेरिका वाळीत टाकल्यासारखे वागवू शकत नाही, हेही तितकेच स्पष्ट आहे. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या १० वर्षांत अमेरिकेच्या ३ राष्ट्राध्यक्षांसमवेत चांगली मैत्री केली आणि अमेरिकेशी चांगले संबंध निर्माण केले. रशिया आणि युक्रेन युद्धात अमेरिकेने रशियावर निर्बंध घातल्यानंतर भारताने याचे उल्लंघन केले, तरी अमेरिकेने भारतावर कोणतीही कारवाई करण्याचे टाळले.

४ ऊ ६. रशिया : काँग्रेसच्या काळात भारताने रशियाला आपला मित्र बनवला. ‘काँग्रेसच्या काळात रशियाची गुप्तचर संस्था ‘के.जी.बी.’च्या गुप्तचरांचा देहलीमध्ये सुळसुळाट होता’, असे म्हटले जाते. मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी अमेरिकेशीही जवळीक साधली; मात्र त्याच वेळी रशियाशीही मैत्री टिकवून ठेवली. अशी समतोल परराष्ट्र नीती दोन महासत्तांच्या संदर्भात भारताकडून पहिल्यांदाच राबवण्यात आली, हे विशेष !

– श्री. प्रशांत कोयंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


गोल टोपी घालून ‘इफ्तार’ मेजवानीची छायाचित्रे चालतात, तर मग मोदींची ध्यानसाधना करतांनाची छायाचित्रे का चालत नाहीत ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्रात ध्यानसाधनेसाठी गेले होते. त्यांची तेथील वेगवेगळ्या बाजूंनी काढलेली छायाचित्रे जगभर प्रसारित झाली आहेत. अनेकांना ते आक्षेपार्ह वाटत आहे. असे म्हटले जाते की, ध्यानसाधना करतांना छायाचित्रकाचे (‘कॅमेरा’चे) काय काम ?

भारतात योग, ध्यान, पूजा, होमहवन, कपाळावर भस्म अथवा टिळा लावणे, भगवे वस्त्र इत्यादी सर्व हिंदु परंपरांचा इतका अवमान केला गेला आहे. त्या परंपरांचा बॉलीवूड आणि मालिका यांच्या कॅमेर्‍यातून दाखवतांना मोठ्या प्रमाणात अपकीर्त केल्या गेल्या आहेत. त्या रूढीवादी, जुन्या पद्धतीच्या आणि अगदी कलंकितही असाव्यात, अशा पद्धतीने मांडल्या गेल्या आहेत की, त्यावर आता कॅमेर्‍याच्या माध्यमातूनच उत्तर देणे आवश्यक झाले आहे. जोपर्यंत हिंदूंची मूल्ये, प्रतीके आणि चिन्हे यांना त्यांची यथोचित प्रतिष्ठा पुन्हा बहाल होत नाही, तोपर्यंत ‘कॅमेरा’ आवश्यक आहे ! ही सगळी प्रतीके आजच्या जगात ‘कूल’ (काळाला अनुसरून) वाटत नाहीत, तोवर ‘कॅमेरा’सारखे प्रभावी अस्त्र वापरतच रहावे लागणार आहे. बाकी गोल जाळीदार टोपीतील ‘इफ्तार’ मेजवानीतील माजी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांची छायाचित्रे कॅमेराविनाच काढली होती का आजवर ? नाही ना ! मग हेही चालवून घ्यावेच लागेल !

– वेद कुमार (साभार : फेसबुक)