कोल्हापूर जिल्ह्यात संशयित ठिकाणी ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांच्या देशात पाठवा !

हिंदु जनजागृती समितीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जिल्हाधिकारी अमोल येडगे (उजवीकडे) यांच्याशी चर्चा करतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर – कोल्हापूर पोलिसांनी नुकतेच २ बांगलादेशी घुसखोर महिलांना अटक केली आहे. या दोघींकडे बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड आणि पॅनकार्डही सापडले आहे. कोल्हापूर येथे बांगलादेशी महिला सापडणे, ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही उंचगाव-गांधीनगर येथे अशा घटना घडल्या आहेत. ही घटना उघड होण्याच्या पूर्वी पुणे, सिंधुदुर्ग, नवी मुंबई येथेही अशा घटना उघडकीस आल्या आहेत. ही गोष्ट देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. तरी कोल्हापूर जिल्ह्यात संशयित ठिकाणी ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढा आणि त्यांच्या देशात परत पाठवा, या मागणीचे निवेदन २४ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.

या नागरिकांना बांगलादेश येथून घेऊन येण्यापासून याचा सूत्रधार कोण ? यांना पारपत्र कोण बनवून देतो ? यांचे स्थानिक पाठीराखे कोण ? याचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच अशा प्रकारचे लोक हे विविध खोटी नावे धारण करून रहातात. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक घरमालकाला त्यांनी नागरिकांनीही कुणासह भाड्याने खोली देतांना त्याची चौकशी करूनच त्यांना भाडेकरू म्हणून ठेवावे, या संदर्भात आवश्यक त्या सूचना द्याव्यात, तसेच काही संशयास्पद वाटल्यास लगेचच पोलिसांना कळवावे, अशा सूचना दिल्या पाहिजेत, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री. अर्जुन आंबी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. सुनील सामंत, ‘महाराज प्रतिष्ठान’चे श्री. निरंजन शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव आणि उपशहरप्रमुख श्री. शशी बीडकर, हिंदुत्वनिष्ठ श्री. अभिजित पाटील आणि श्री. रामभाऊ मेथे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, ‘राष्ट्रहित प्रतिष्ठान’चे श्री. शरद माळी, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप आणि श्री. नंदकुमार घोरपडे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निवेदन देण्यासाठी उपस्थित असलेले हिंदुत्वनिष्ठ

पंचगंगा नदी प्रदूषित करणार्‍या घटकांवर समयमर्यादा ठेवून कारवाई करा !

कोल्हापूर – पंचगंगा नदी सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच विविध सामाजिक संघटना, महापालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळ यांच्या संयुक्त पहाणीत ४२ दशलक्ष लिटर सांडपाणी पंचगंगेत मिसळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील गंभीर गोष्ट म्हणजे अनेक नाल्यांमधील सांडपाणी हे मैलामिश्रीत आणि काळे असून ते फेसाळलेले होते. इचलकरंजी येथेही तीच स्थिती असल्याचे समोर आले आहे. प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते. तरी ज्या कारणांमुळे नदी प्रदूषित होते, त्यांच्यावर समयमर्यादा ठेवून कारवाई व्हावी आणि वर्षभर ज्या प्रमुख कारणांमुळे पंचगंगा नदी प्रदूषित होते, त्यावर प्रथम कारवाई करावी, या मागणीचे निवेदनही या प्रसंगी देण्यात आले.

‘पंचगंगा नदी प्रदूषणावर सध्या काम चालू असून शहर आणि ग्रामीण भागातील सांडपाणी प्रक्रिया न करता मिसळू नये यांसाठी शुद्धकरण प्रकल्प उभारण्यात येत आहेत. दोन-अडीच वर्षे हे काम चालेल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या प्रसंगी सांगितले.

सध्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी जलपर्णी वाढलेली आढळते. त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी. नदी प्रदूषणाचे प्रमुख कारण हे नदीत मिसळणारे सांडपाणी, तसेच अन्य विविध घटक हेच असल्याने या वर्षीपासून पंचगंगा नदीवर ‘बॅरिकेटस्’ लावून भाविकांना मूर्तीविसर्जन करण्यास बंदी न करता ज्या भाविकांना पंचगंगा नदीत विसर्जन करावयाचे आहे, त्यांना ते करू देण्यात यावे, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.

संपादकीय भूमिका

बांगलादेशी घुसखोरांवरील कारवाईविषयी हिंदुत्वनिष्ठांना निवेदन द्यावे लागते, यातून पोलिसांची निष्क्रियताच दिसते !