‘जमावाला धर्म नसतो’ ! : राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती फर्जंद अली यांची टिप्पणी

हिंदूंच्या मिरवणुकीवर आक्रमण करणार्‍या १८ मुसलमानांना जामीन संमत !

जयपूर (राजस्थान) – ‘जमावाला कोणताही धर्म नसतो’, अशी टिप्पणी करत राजस्थान उच्च न्यायालयाने एका प्रकरणात १८ जणांना जामीन संमत केला आहे. हे प्रकरण बाबू महंमद विरुद्ध राजस्थान सरकार असे आहे. १९ मार्च २०२४ या दिवशी राज्यातील चित्तोडगडमध्ये हिंदूंच्या मिरवणुकीवर आक्रमण करणार्‍या जमावात १८ मुसलमानांचा सहभाग होता. सत्र न्यायालयाने अटकेत असलेल्या सर्व १८ जणांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

या प्रकरणाची सुनावणी करतांना राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती फर्जंद अली म्हणाले की,

१. दोन भिन्न समुदायांमध्ये हिंसाचार झाला आणि धार्मिक भावनादेखील दुखावल्या गेल्या असतील. असे असले, तरी वाद निर्माण करण्यासाठी आणि लोकांना दुखापत करण्यासाठी कोण उत्तरदायी आहे ?, हे ठरवणे कठीण आहे.

२. जमावाला कोणताही धर्म नसतो. जेव्हा लोकांच्या मोठ्या गटाने एखादी घटना घडवली, तेव्हा कोण आरोपी आहे ? आणि कोण निर्दोष आहे ?, हे शोधणे पुष्कळ कठीण आहे.

३. अपीलकर्ते (याचिका करणारे) दोषी आहेत कि नाही ?, यावर काहीही भाष्य करणे सध्या योग्य रहाणार नाही.

४. मृत्यू हा हिंसाचारामुळे झाला नसून हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे; कारण मृताच्या गुडघ्यावर केवळ एक छोटीशी जखम होती, जी मृत्यूचे कारण असू शकत नाही.

काय आहे प्रकरण ?

राज्यातील चित्तोडगड येथे मार्च २०२४ मध्ये भगवान चारभुजनाथ यांच्या मिरवणुकीवर काही धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले होते. या वेळी त्यांनी दगडफेकही केली, तसेच वाहने आणि दुकाने जाळण्यात आली. या हिंसाचारात एका हिंदूचा मृत्यू झाला होता.