आणखी २ दिवस राज्यात उष्णतेची लाट !

मुंबई – हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम रहाण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक भागांमध्ये पाऊस किंवा विजांच्या गडगडाटासह पाऊस बरसू शकतो. पुणे, जळगाव, धुळे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना या १० जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह वादळी वारे वाहू शकतात. उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगरमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मुंबईत उष्ण आणि दमट हवामान कायम रहाणार आहे. मान्सून १९ मेपर्यंत अंदमानात आल्यास ३१ मेच्या आसपास नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये वहातील. त्यामुळे ७ ते १० जूनच्या आसपास महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो.