शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

शरद पवार यांच्या विधानावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया !

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

जळगाव – पक्ष चालवणे हे आता शक्य नसल्याचे शरद पवार यांच्या लक्षात आले आहे, तसेच लोकसभा निवडणुकीतील पराभवाची चाहूलही त्यांना लागली आहे. त्यामुळे ४ जूननंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल’, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ‘येत्या काळात देशभरातील छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षांचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये होईल’, असे वक्तव्य नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत केले होते. याच्या संदर्भाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील विधान केले आहे. ते जळगाव लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते.

या वेळी ते म्हणाले की, शरद पवारांनी यापूर्वी अनेक वेळा राजकीय भूमिका बदलल्या, पक्ष तयार केले आणि पुन्हा काँग्रेसमध्येही गेले. आता पुन्हा एकदा त्यांनी तसेच संकेत दिले आहेत.