संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे २९ जूनला श्रीक्षेत्र आळंदीहून प्रस्थान !

पुणे – पायी आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी परंपरेनुसार ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला, म्हणजे २९ जून या दिवशी श्रीक्षेत्र आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. १७ जुलैला आषाढी एकादशी असून ही पालखी १६ जुलैला पंढरपूरला पोचेल. या पालखी सोहळ्यात ३ उभे रिंगण आणि ४ गोल रिंगण होणार आहेत. एकूण ३२ दिवसांचा प्रवास करून पालखी ३० जुलैला परत आळंदी येथे परतेल. आळंदी देवस्थानचे विश्‍वस्त आणि दिंडी समाज यांची बैठक १८ एप्रिलला सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक वाचण्यात आले. या वेळी पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ महाराज, प्रमुख विश्‍वस्त अधिवक्ता राजेंद्र उमाप यांच्यासह अन्य उपस्थित होते.

पालखी सातारा जिल्ह्यात लोणंद येथे अडीच दिवस, फलटणमध्ये एक दिवस, पुणे जिल्ह्यातील पुणे शहर आणि सासवड येथे प्रत्येकी २ दिवसांच्या मुक्कामी असेल. ‘पालखी तळांसाठी मुक्कामाच्या ठिकाणी आणि विसाव्याच्या ठिकाणी जागा अपुरी पडत आहे. यासाठी शासनाने अतिरिक्त भूमीची मागणी करून पाठपुरावा करावा’, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

पालखी सोहळ्यात या या ठिकाणी असेल रिंगण . . . 

१. पहिले उभे रिंगण – चांदोबाचा लिंब
२. दुसरे गोल रिंगण – पुरंदवडे
३. दुसरे गोल रिंगण – खडस फाटा
४. तिसरे गोल रिंगण – ठाकूरबुवाची समाधी
५. दुसरे उभे रिंगण – बाजीरावची विहीर-वाखरी
६. चौथे गोल रिंगण – बाजीरावची विहीर – वाखरी
७. तिसरे उभे रिंगण – इसबावी पादुकांजवळ पंढरपूर प्रवेशापूर्वी