कच्चाथिवू बेट परत मिळवण्यासाठी श्रीलंकेशी करावे लागेल युद्ध ! – भारताचे माजी महाधिवक्ता मुकुल रोहतगी

  • भारताचे माजी महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांचे विधान !

  • वर्ष १९७४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी श्रीलंकेकडून काहीही न घेता भेटस्वरूपात देऊन टाकले बेट !

मुकुल रोहतगी

नवी देहली – भारताचे माजी महाधिवक्ता मुकुल रोहतगी कच्चाथिवू नावाचे बेट काँग्रेस सरकारने कोणताही मोबदला घेता श्रीलंकेला आंदण म्हणून देऊन टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. जर आपल्याला हे बेट परत घ्यायचे असेल, तर आता श्रीलंकेशी युद्ध करावे लागेल, असेही ते या वेळी म्हणाले.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताचे कच्चाथिवू नावाचे बेट श्रीलंकेला देऊ केले होते. ही माहिती माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत केलेल्या अर्जातून समोर आली आहे. याविषयीची माहिती स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देऊन काँग्रेसला लक्ष्य केले. वर्ष २०१४ मध्ये मुकुल रोहतगी महाधिवक्ता होते. त्या वेळीही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात कच्चाथिवू बेटासंदर्भात केलेले विधान चर्चेत आले होते. तमिळनाडूच्या रामेश्‍वरम्पासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर हे बेट आहे.

भूभागांच्या देवाण-घेवाणीची परंपरा !

साधारणपणे दोन शेजारी देशांमध्ये भूभागांची देवाण-घेवाण होत असते. यात एका राष्ट्राकडून दुसर्‍या राष्ट्राला एखाद्या भूभागाच्या बदल्यात दुसरा भूभाग दिला जातो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अशा प्रकारे वर्ष १९५८ ते १९६० या काळात देवाणघेवाण झाली होती, असे रोहतगी म्हणाले. काही वर्षांपूर्वी मोदी शासनाने बांगलादेशबरोबर अशाच प्रकारे काही भूभागांची देवाण-घेवाण केली होती. असे असले, तरी कोणतीही परतफेड न मिळता काँग्रेसने कच्चाथिवू बेट श्रीलंकेला का दिले ? त्या बदल्यात भारताला काय मिळाले, या प्रश्‍नांची उत्तरे काँग्रेसला द्यावी लागतील, असेही रोहतगी या वेळी म्हणाले.

संपादकीय भूमिका 

भारताच्या अखंडत्वाला सुरुंग लावण्याची काँग्रेसची परंपराच राहिली आहे. आता मतदानाच्या माध्यमातून तिला कायमचे घरी बसवण्यासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे !