राजालाही पायउतार व्हावे लागते ! – प.पू सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प.पू सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

मुंबई : राजा हा समाजामुळे असतो आणि नीट राज्यकारभार केला नाही, तर त्याला पायउतारही व्हावे लागते, अशी अनेक उदाहरणे आहेत. देशाचे उत्थान आणि पतन हे समाजाचे उत्थान अन् पतन यांवर अवलंबून असते. समाजपरिवर्तनात सामाजिक संस्थांसह सर्वांचेच दायित्व महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. मुंबईतील विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या १०१ व्या वर्धापनदिनानिमित्ताने ते ‘नागरिकांनी आणि राज्यकारभार करणार्‍या राज्यकर्त्यांनी कोणती मूल्य जपली पाहिजेत ?’, याविषयावर बोलत होते.

ते पुढे म्हणाले,

‘‘पैशांची उधळपट्टी न करता समाजात साधेपणाने आणि काटकसरीने रहावे. स्वदेशीची कास धरून गरजूंना आर्थिक साहाय्य करावे. घरात दोन मोटारगाड्या, महागडा स्मार्ट रंगीत दूरचित्रवाणी संच आदी चैनीच्या वस्तूंची खरोखर आवश्यकता आहे का ?, याचाही प्रत्येक सुजाण नागरिकाने विचार करावा. नागरिकांनी नियमांचे पालन करून पर्यावरणाचे रक्षण करावे. सुजाण, शिस्तप्रिय आणि देशभक्त नागरिक अन् समाज असेल, तर तो देश मोठा होतो. या दृष्टीने सामाजिक संस्थांनी नागरिकांमध्ये ही जाणीव आणि प्रेरणा निर्माण करण्यासाठी मनपरिवर्तनाचे दायित्व पार पाडावे.’’