श्रीराममंदिर बांधल्यामुळे भाजपला निवडणुकीत अधिक जागा मिळाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – पेजावर मठाचे विश्‍व प्रसन्न तीर्थ स्वामीजी

उडुपी पेजावर मठाचे विश्‍व प्रसन्न तीर्थ स्वामीजी

दावणगेरे (कर्नाटक) – अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनानंतर ४० दिवस प्रभु श्रीरामाची पूजा करणारे आणि श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सदस्य असणारे उडुपी पेजावर मठाचे विश्‍व प्रसन्न तीर्थ स्वामीजी आता कर्नाटकात परतले आहेत. दावणगेरे येथे बोलतांना ते म्हणाले की, श्रीराममंदिर बांधल्यामुळे भाजपला निवडणुकीत अधिक जागा मिळाल्यास आश्‍चर्य वाटू नये.

स्वामीजी म्हणाले की, श्रीरामाच्या राज्यातून (उत्तरप्रदेशातून) आज हनुमानाच्या राज्यात (कर्नाटकात) आलो आहे. अयोध्येप्रमाणेच हनुमानाच्या पुण्यक्षेत्राची अभिवृद्धी झाली पाहिजे. त्यासाठी एका विश्‍वस्त समितीची स्थापना केली पाहिजे.

हिंदूंच्या मंदिरांचे उत्पन्न हिंदु धर्मासाठीच उपयोगात आणावे !

कर्नाटक राज्यात हिंदूंच्या मंदिरांचे उत्पन्न अन्य धर्माच्या कल्याणासाठी उपयोगात आणले जाते, असा आरोप केला जात आहे. याविषयी स्वामीजी म्हणाले की, सरकारने हिंदूंच्या मंदिरांचे उत्पन्न हिंदु धर्माच्या उत्कर्षासाठी वापरले पाहिजेे.