इचलकरंजी शहर पाणीपुरवठा योजनेसाठीच्या तज्ञ समितीचा अहवाल १ मासात द्यावा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुंबई, २ मार्च (वार्ता.) – इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) शहरासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा योजना चालू करण्यासंदर्भात तज्ञांची समिती नेमून १ मासात अहवाल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. इचलकरंजी शहरासाठी ‘सुळकुड उद्धव पाणीपुरवठा योजने’च्या संदर्भात

१ मार्च या दिवशी विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. दूधगंगा नदीतून ‘सुळकुड पाणी योजना’ मान्य झाली आहे; परंतु येथून पाणी देण्यास विरोध असल्याने मार्ग काढण्यासाठी ही बैठक झाली.

या वेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रकाश आबिटकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हाळवणकर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांसह विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, इचलकरंजी शहरासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे. हे पाणी देताना कोणाचेही पाणी हिरावून घेतले जाणार नाही. या विषयावर मध्यममार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी तज्ञांची समिती स्थापन करावी. यामध्ये कृती समितीचे प्रतिनिधी, जलसंपदा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महानगपालिकेचे अधिकारी, तसेच तांत्रिक तज्ञांचा समावेश करावा. या समितीने सर्वांची बाजू आणि सूचना ऐकून घेऊन तांत्रिक अभ्यास करून १ मासात अहवाल सादर करावा. या वेळी पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि कृती समितीच्या सदस्य यांनी बाजू मांडली.