कुटुंबियांचा आधारस्तंभ आणि सतत कृतज्ञताभावात असणारे पू. (कै.) चंद्रसेन मयेकर !

आज पू. (कै.) चंद्रसेन मयेकर यांची प्रथम पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

‘पू. (कै.) चंद्रसेन मयेकर (सनातनचे ७८ वे संत) यांनी माघ शुक्ल पंचमी (२६.१.२०२३) या दिवशी देहत्याग केला. १४.२.२०२४ या दिवशी त्यांची प्रथम पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांचा मुलगा आणि नातू यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्या देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

पू. (कै.) चंद्रसेन मयेकर

१. श्री. महेश मयेकर (पू. (कै.) मयेकर यांचा मुलगा), राजापूर, जिल्हा रत्नागिरी.

१ अ. गुरूंप्रती दृढ श्रद्धा : ‘पू. बाबा अत्यवस्थ असतांनाही त्यांचा रात्रभर नामजप चालू असे. ते नेहमी म्हणत, ‘‘माझे गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्या पाठीशी असल्याने मला कशाचीही काळजी नाही.’’ त्यांनी साधकांच्या मनावरही गुरूंप्रती दृढ श्रद्धा बिंबवली होती. त्यांनी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत गुरुआज्ञेचे पालन केले आणि ते आम्हालाही त्याची जाणीव सतत करून देत राहिले.

१ आ. हसतमुख आणि शांत : पू. बाबा रुग्णाईत असतांनाही हसतमुख आणि शांत होते. त्यांनी स्वतःला होत असलेल्या वेदना आणि त्रास आम्हाला कधीच जाणवू दिला नाही.

१ इ. ते वडीलकीच्या नात्याने मला धीर देत असत आणि मार्गदर्शन करत असत. ‘मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली’, हे माझे परम भाग्य आणि गतजन्माची पुण्याई !

२. पू. बाबांच्या देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्री. महेश मयेकर

अ. त्यांचा चेहरा आणि देह यांवरील तेजात वाढ झाली होती.

आ. त्यांच्या देहाला एक वेगळाच सुगंध येत होता. मला तो सुगंध वर्षभर अधून मधून जाणवत होता.

इ. त्यांच्या अस्तित्वाची प्रचीती आम्हाला आणि अन्य जणांना येत होती. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही वेगळी उत्साहवर्धक अशी अनुभूती येत होती. सर्वसामान्यतः एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या घरी दुःखदायक वातावरण असते; मात्र पू. बाबांच्या देहत्यागानंतर घरात चैतन्यमय वातावरण होते आणि याची अनुभूती उपस्थित सर्वांनाच येत होती.

ई. नाथपंथीय संप्रदायातील माझ्या बंधूंना पू. बाबांची अंत्ययात्रा म्हणजे एक भावसोहळा वाटत होता.

उ. आजही पू. बाबांचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येतो. ते नेहमी ‘मी आहे. काळजी करू नकोस’, असा धीर देत सदैव आमच्या समवेत आहेत’, अशी आम्हाला अनुभूती येते.’

३. श्री. प्रतीक हरेश मयेकर (पू. (कै.) मयेकर यांचा नातू), राजापूर, जिल्हा रत्नागिरी.

३ अ. ‘पू. आजोबा नेहमी माझे लाड करत असत. मी त्यांना बिलगून असे.

३ आ. देहाला सुगंध येणे : त्यांच्या देहाला कापूर आणि अत्तर यांचा सुगंध नेहमी येत असे. तसा सुगंध मला अधून मधून येत असतो आणि त्यांच्या वात्सल्याची अनुभूती देतो.

३ इ. कृतज्ञताभाव : ‘आपण परमेश्वर आणि गुरु’ यांच्या कृपेमुळे आहोत’, असे ते मला सातत्याने सांगत असत.

३ ई. माझ्या आई-वडिलांच्या निधनानंतर माझ्यासाठी माझे आजोबा हेच माझा आधार आणि सर्वस्व होते.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १२.२.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक