India Slams Pakistan : पाकने स्वतःच्या दुष्कृत्यांसाठी इतरांवर दोषारोप करू नये ! – भारताने फटकारले

पाकिस्तानकडून त्याच्या देशातील आतंकवाद्यांना ठार केल्याचा भारतावर आरोप

नवी देहली : पाकिस्तानने त्याच्या देशात आतंकवाद्यांच्या होणार्‍या हत्यांसाठी भारताला उत्तरदायी ठरवल्यानंतर भारताने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या वर्षी सियालकोट आणि रावळकोट येथे जैश-ए-महंमद अन् लष्कर-ए-तोयबा यांच्या प्रत्येकी एका आतंकवाद्याची हत्या केल्याच्या प्रकरणांत भारतीय हस्तकांचा हात असल्याचा ठोस पुरावा असल्याचा दावा पाकने केला होता. यावर भारताने म्हटले आहे की, स्वतःच्या दुष्कृत्यांसाठी इतरांवर दोषारोप करणे न्याय्य ठरू शकत नाही किंवा (समस्येवर) तोडगाही असू शकत नाही.

१. जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहर याचा प्रमुख सहकारी शाहिद लतीफ आणि पठाणकोटमधील भारतीय वायू दलाच्या तळावर वर्ष २०१६ मध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार रियाझ अहमद उपाख्य अबू कासिम यांच्या गेल्या वर्षी पाकमध्ये हत्या करण्यात आल्या होत्या.

(सौजन्य : Times Now)

२. पाकचे परराष्ट्र सचिव महंमद सायरस सज्जाद काझी यांनी आरोप केला होता की, भारत पाकिस्तानमधील या हत्यांमध्ये सहभागी आहे. भारतीय हस्तकांनी तंत्रज्ञान आणि परदेशी भूमीवरील सुरक्षित आश्रयस्थानांचा वापर करून पाकिस्तानमध्ये हत्या घडवून आणल्या. त्यांनी या हत्या घडवून आणण्यासाठी गुन्हेगार, आतंकवादी आणि संशयित नागरिक यांचे साहाय्य घेतले, त्यांना पैसे अन् पाठिंबा दिला. यासाठी सामाजिक माध्यमांचा वापर करण्यात आला.

३. शाहिद लतीफ याच्या हत्येचा संदर्भ देत काझी म्हणाले की, तिसर्‍या देशात रहाणार्‍या योगेश कुमार या भारतीय हस्तकाने या हत्यांचा कट रचला, असे तपासात समोर आले आहे. कुमार याने लतीफचा माग काढण्यासाठी आणि त्याला ठार मारण्यासाठी पाकिस्तानमधील स्थानिक गुन्हेगारांशी संबंध असलेल्या तिसर्‍या देशातील कामगार महंमद उमैर याची निवड केली; मात्र हे काम पूर्ण होऊ शकले नाही.

पाकिस्तान जे पेरतो तेच कापून काढत आहे ! – भारत

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, खोटा आणि द्वेषपूर्ण भारतविरोधी प्रचार करण्याचा हा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. जगाला ठाऊक आहे की, पाकिस्तान दीर्घकाळापासून आतंकवाद, संघटित गुन्हेगारी आणि सीमेवरील बेकायदेशीर कारवायांचा केंद्रबिंदू राहिला आहे. भारत आणि इतर अनेक देशांनी पाकिस्तानला उघडपणे चेतावणी दिली आहे की, आतंकवाद आणि हिंसा या त्याच्या संस्कृतीमुळे तो नष्ट होईल. पाकिस्तान जे पेरतो, तेच कापून काढत आहे. त्याच्या कुकृत्यांसाठी इतरांना उत्तरदायी ठरवणे, हे दोन्ही, म्हणजे न्याय्यही ठरू शकत नाही आणि उपायही होऊ शकत नाही.

संपादकीय भूमिका

  • पाकिस्तान, कॅनडा आणि अमेरिका त्यांच्या देशातील जिहादी अन् खलिस्तानी आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यातील काही जणांच्या होत असलेल्या हत्यांसाठी भारताला उत्तरदायी ठरवणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखेच आहे !
  • जगाने पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले पाहिजेत आणि ते साध्य केले पाहिजे !