आजच्या पाल्यांना पंचकोशाधारित शिक्षणाची आवश्यकता आहे ! – दिलीप बेतकेकर, विद्याभारती अ.भा. शिक्षण संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष

करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा संस्थेचा सातवा वर्धापनदिन उत्साहात साजरा!

करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा’ संस्थेच्या वर्धापनदिनी श्री. दिलीप बेतकेकर यांचा सत्कार करतांना चंद्रकांत हळबे. समवेत डावीकडून राजेश गांगण, सीए वरदराज पंडित आणि सीए अभिजित पटवर्धन

रत्नागिरी – माणसाचे जीवन हे हिमनगाप्रमाणे आहे. वर वर दिसणारे टोक म्हणजे भौतिक गरजा; परंतु मानसिक, भावनिक, मेंदूचा विकास, आनंदी भावना या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात आहे. आजच्या पाल्यांना पंचकोषाधारित शिक्षणाची आवश्यकता आहे. ‘अन्नमय कोष, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश’ या अनुषंगाने पाल्यांना शिक्षण दिले पाहिजे, असे मार्गदर्शन विद्याभारती अ.भा. शिक्षण संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. दिलीप बेतकेकर यांनी केले.

‘करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा’ या संस्थेचा सातवा वर्धापनदिन ५ जानेवारी या दिवशी झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवन येथे उत्साहात साजरा झाला. त्या वेळी ‘घर प्रसन्नतेने नटवू’ या विषयावर श्री. बेतकेकर बोलत होते.


या वेळी व्यासपिठावर ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे, करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष सीए वरदराज पंडित, उपाध्यक्ष राजेश गांगण, कोषाध्यक्ष सीए अभिजित पटवर्धन उपस्थित होते. भारतमाता पूजनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या वेळी संस्थेच्या ७ वर्षांतील वाटचालीवर आधारित लघुपट दाखवण्यात आला.

श्री. बेतकेकर म्हणाले की,

१. प्रत्येक बालकांमध्ये ८ प्रकारची किमान बुद्धीमत्ता असते. शिक्षण म्हणजे त्यांच्या डोक्यात काही भरवायचे नाही, तर ही बुद्धीमत्ता बाहेर काढायची आहे. अन्नमयकोश, प्राणमयकोश, मनोमयकोश याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

२. मन हे शक्तीचे आधारकेंद्र आहे. आपल्या मनामध्ये २४ तासांमध्ये ६० सहस्र विचार येतात; परंतु त्यातील ९५ टक्के विचार भूतकालीन आणि नकारात्मक असतात. हे विचार सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न करावा.

३. अलीकडे मुलांचा बुद्ध्यांक (आयक्यू) वाढत आहे आणि ‘ईक्यू’ खाली येऊ लागला आहे. कुटुंबाच्या दिसणार्‍या गरजा भागवण्याकडे लक्ष दिले जाते; परंतु मुलांचे, स्वतःचे व्यक्तीमत्त्व आनंदी, प्रसन्न होण्यासाठी लक्ष दिले जात नाही.

४. भूतानमध्ये ‘जीडीपी’ नव्हे, तर ‘हॅप्पी इंडेक्स’ मोजला जातो. त्या देशातील माणसे किती आनंदी, प्रसन्न आहेत, याचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. माणूस आनंदी असेल, तर आजारी पडत नाही. त्यामुळेच तेथे न्यूनतम डॉक्टर आहेत.

५. आताच्या काळात मुलांना आई-वडील प्रचंड सुरक्षित वातावरणात वाढवतात. मुलांची अती काळजी आणि अती संरक्षण यांमुळे आजची मुले कचकड्याच्या बाहुल्या झाल्या आहेत.

या वेळी अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे यांनी उज्ज्वल भारतीय संस्कृतीच्या उत्तुंग गोष्टी थोडक्यात सांगितल्या. करसल्लागार असोसिएशनचे काम चांगल्या प्रकारे चालू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

सीए वरदराज पंडित यांनी सांगितले की, सात वर्षांच्या कालावधीमध्ये संस्थेने सभासद आणि व्यापारी यांच्यासाठी अनेक उपयुक्त कार्यक्रम घेतले. कोरोना काळात आणि चिपळूण पूरग्रस्त परिस्थितीमध्ये समाजोपयोगी कार्य केले. करसल्लागारांसमोर आता नवनवीन आव्हाने आहेत. त्याकरता प्रशिक्षित कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे. त्याकरताही प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
सीए वैभव देवधर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय अधिवक्ता उज्ज्वल बापट यांनी करून दिला. चंद्रकांत हळबे यांच्या हस्ते श्री. बेतकेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करसल्लागार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांनी मेहनत घेतली.