श्री दत्तात्रेयांची गुणवैशिष्ट्ये !

सनातननिर्मित दत्त देवतेचे सात्त्विक चित्र

१. ज्ञान, वात्सल्य आणि वैराग्य यांचा संगम

‘भगवान दत्तात्रेय म्हणजे ‘ब्रह्मा, विष्णु आणि महेश’ या त्रिमूर्तींचे रूप. ब्रह्मदेव ज्ञानस्वरूप, श्रीविष्णु वात्सल्यस्वरूप आणि शिव वैराग्यस्वरूप आहे. अशा त्रिमूर्तींचे एकत्रित रूप असणार्‍या दत्तात्रेयांमध्ये ज्ञान, वात्सल्य आणि वैराग्य यांचा सुरेख संगम झाला आहे.

कु. मधुरा भोसले

२. वैराग्य आणि संन्यस्थ

दत्तात्रेयांमध्ये वैराग्य असल्यामुळे ते संन्यस्त जीवन व्यतीत करतात. त्यांचा निवास मेरुशिखरावर असतो. संध्या आणि अन्य दिनक्रम ते इतर ठिकाणी पूर्ण करतात. त्यांच्यात वैराग्य वृत्ती प्रबळ असल्याने त्यांना कोणत्याही स्थानाचे मोहबंधन नाही. ते ‘स्वेच्छाविहारी’ आहेत. ते जीवनमुक्त असल्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडात मुक्तपणे विचरण करतात. दत्तात्रेय भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांना वैराग्याचा आशीर्वाद देतात. जगात सर्व काही मिळेल; परंतु देवदुर्लभ असे वैराग्य केवळ श्रीगुरुकृपेनेच मिळते.

३. अखंड शिष्यभावात असणे

भगवान दत्तात्रेय सद्गुरुपदावर विराजमान असले, तरी ते वृत्तीने सतत ‘शिष्य’ अवस्थेत वावरतात. ‘शिष्य म्हणजे अखंड शिकत रहाणे.’ शिष्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगवान दत्तात्रेय होय. श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधात यदु आणि अवधूत यांचा संवाद आहे. ‘आपण कोणते गुरु केले आणि त्यांच्यापासून काय बोध घेतला’, हे यांत अवधूत यांनी सांगितले आहे. त्यांच्या शिष्यावस्थेमुळेच त्यांनी २४ गुरु आणि २४ उपगुरु केले. ते प्रत्येक प्राणीमात्राला गुणगुरु मानतात आणि प्रत्येकाकडून शिकत असतात.

४. अहं अल्प असणे

संन्यस्त जीवन व्यक्तीत करत असतांना ते प्रतिदिन दुपारची भीक्षा कोल्हापूरला येऊन मागतात. त्यांचा अहं अल्प असल्यामुळे ते ज्ञानगुरुपदावर आरूढ असूनही भिक्षा मागतात. (‘कोल्हापूर येथील ‘भिक्षापात्र दत्त मंदिरात’ प्रतिदिन दुपारी सूक्ष्मातून दत्तात्रेय भिक्षा ग्रहण करण्यासाठी येतात’, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यांच्या स्वागतासाठी दुपारी १२ वाजता आरती केली जाते.)

५. ‘भक्तवत्सल’ असल्यामुळे ‘स्मर्तृगामी’ असणे

दत्तात्रेयांमध्ये वैराग्यभाव प्रबळ असल्यामुळे ते सर्व मोहमायेपासून अलिप्त आहेत; परंतु ते भक्तांच्या प्रेमाच्या मायेत बद्ध आहेत. कोणत्याही भक्ताने त्यांचे स्मरण करताच ते तात्काळ प्रगट होतात. त्यामुळे त्यांना ‘स्मर्तृगामी’ म्हटले आहे. यातून त्यांच्यातील भक्तवत्सलतेचे दर्शन घडते. श्रीगुरुचरित्रात श्रीपादश्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांनी भक्तांचा उद्धार केल्याचा उल्लेख आढळतो.

६. क्षमाशील

शिष्य कितीही चुकला, तरी गुरु त्याला क्षमा करून पुन्हा शिकण्याची संधी देतात, याचे उत्तम उदाहरण भगवान दत्तात्रेय आहेत. ते केवळ शिष्याचे दोष क्षमा करत नसून विरोधकांचे अपराधही क्षमा करून त्यांचा उद्धार करतात. श्रीपादश्रीवल्लभ यांचा द्वेष करणार्‍या ‘नरसावधानी’ नावाच्या मनुष्याला कर्मफलन्यायानुसार कठोर शिक्षा मिळाली होती. तेव्हा त्याने श्रीपादश्रीवल्लभांचे चरण धरले. यावर क्षमाशील वृत्तीच्या श्रीपादश्रीवल्लभांनी नरसावधानीला क्षमा करून त्याचा उद्धार केल्याचे उदाहरण श्रीपादश्रीवल्लभ यांच्या जीवनचरित्रात आढळते. दत्तगुरूंच्या क्षमाशीलतेची अनेक उदाहरणे गुरुचरित्रात आपल्याला पहावयास मिळतात.

७. निवृत्तीमार्ग आणि संन्यासाश्रम यांचे प्रतीक

भगवान दत्तात्रेय वैरागी असल्यामुळे निवृत्तीमार्गी आहेत. ते संन्यास धर्माचे काटेकोरपणे पालन करतात. भगवान दत्तात्रेय हे निवृत्तीमार्ग आणि संन्यासाश्रम यांचे प्रतीक असून ते अखंड ब्रह्मचारी आहेत.

८. निर्गुण स्वरूप असूनही सगुणमय असणे

दत्ततत्त्व हे निर्गुणाचे वाचक असल्यामुळे भगवान दत्त मूलत: निर्गुण स्वरूप आहेत; परंतु साधक, शिष्य आणि भक्तगण यांना घडवण्यासाठी अन् विविध अनुभूतींतून शिकवण्यासाठी, ते देहधारी गुरूंच्या रूपाने अवतरित होतात. दत्तात्रेय ‘निर्गुण स्वरूप असूनही सगुणमय’ असल्यामुळे त्यांनी अंशावतार धारण करून अवतारी कार्य केले.

९. योग आणि तंत्रशास्त्र यांचे महान ज्ञाता

भगवान दत्तात्रेय योगसाधनेत निपुण आहेत. त्यांनी दिलेल्या शक्तीपातयोगाच्या दीक्षेमुळे शिष्य योगसाधनेत पारंगत होतो. भगवान दत्तात्रेय हे तंत्रशास्त्राचेही महान ज्ञाता आहेत. नाथसंप्रदायाची एक प्रमुख शाखा भगवान दत्तात्रेयांना गुरु मानते. या शाखेचे अनुयायी नाथसंप्रदायानुसार साधना करून तंत्रशास्त्राचे ज्ञान प्राप्त करतात.

१०. भ्रमण करत असूनही अखंड साधनारत असणे

शिवशंकराप्रमाणे दत्तात्रेयसुद्धा प्रत्येक क्षणी साधनारत असतात. ते विरक्त आणि संन्यस्त जीवन जगत असल्याने सतत भ्रमण करतात; परंतु त्याच वेळी ते ध्यानधारणा अन् योगसमाधी यांद्वारे साधनारत रहातात. गिरनार पर्वताच्या ठिकाणी वास करून ते अखंड साधना करतात.

११. धर्म आणि मोक्ष यांचे आश्रयदाते

भगवान दत्तात्रेयांचे तत्त्व ‘मोक्ष’ पुरुषार्थाचे अनुसरण करत असते. दत्तगुरूंचे अवतार ‘धर्म’ या पुरुषार्थाची जोपासना करतात. धर्माच्या चार पुरुषार्थांपैकी ‘धर्म आणि मोक्ष’ यांना दत्तात्रेयांचा आश्रय लाभलेला आहे.

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.