Ram Mandir Ceremony : अयोध्येतील सर्व हॉटेल्स आणि अतिथीगृहे यांचे आरक्षण रहित !

  • श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्य सरकारचा निर्णय !

  • निमंत्रणाखेरीज येणार्‍यांना प्रवेशबंदी !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील सुरक्षाव्यवस्थेच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक नुकतीच आयोजित केली होती. यात श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रणपत्राविना अयोध्येत प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. निमंत्रण नसलेल्या लोकांनी अयोध्येत हॉटेल्स आणि अतिथीगृह यांचे आरक्षण केले असेल, तर तेही रहित केले जाणार आहे. अयोध्येत होणार्‍या गर्दीच्या व्यवस्थापनाविषयी प्रशासन सतर्क झाले आहे. आता २२ जानेवारीला केवळ तेच लोक अयोध्येला येऊ शकतील, ज्यांच्याकडे आयोजन समितीचे निमंत्रणपत्र असेल.

१. श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा दिनी, म्हणजेच २२ जानेवारीला आयोजन समितीने अनुमती न दिलेल्या कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला मंदिराच्या परिसरात प्रवेशबंदी असेल.

२. २० जानेवारीपासून मंदिर सामान्य भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहे. २३ जानेवारीपासून मंदिर सर्वसामान्यांसाठी पुन्हा उघडण्यात येईल. त्या वेळी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. अशा परिस्थितीत अयोध्येत प्रशासनाने कडेकोट सुरक्षाव्यवस्था केली आहे.

३. २२ जानेवारी या दिवशी हॉटेल किंवा धर्मशाळा यांमध्ये मुक्काम करणार्‍यांकडून ठरलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क आकारल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

४. हॉटेल किंवा धर्मशाळा यांमधील सर्व कर्मचार्‍यांची पोलीस पडताळणी करण्याची सूचना देण्यात आली आहे.