स्वातंत्र्यवीर सावरकर, एक द्रष्टे हिंदूसंघटक ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगाव (जिल्हा पुणे) आयोजित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ व्याख्यानमाला !

स्वातंत्र्यवीर सावरकर

पुणे, १० डिसेंबर (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकरांना क्रांतीकारक, साहित्यिक, कवी, हिंदुहृदयसम्राट अशा अनेक रूपांनी ओळखले जाते; परंतु आजकालचे नेते त्यांचा अपमान करण्यात दंग आहेत. कर्नाटकचे प्रियांक खर्गे विधानसभेतील सावरकरांचे चित्र काढून टाकण्याची भाषा करतात, तर मणिशंकर अय्यर त्यांची अंदमानातील वचने काढून टाकतात. काँग्रेसचे राहुल गांधी सावरकरांना माफीवीर म्हणतात; पण याच राहुल गांधींनी भिवंडी न्यायालयात माफी मागितली, हे ते विसरतात. मार्सेलिसच्या ८ जुलै १९१० च्या ऐतिहासिक उडीविषयी हुसेन दलवाई म्हणतात, ‘‘यात काय मोठा पराक्रम केला ?’’ संपूर्ण युरोप आणि ब्रिटीश साम्राज्याला धक्का देणार्‍या या उडीविषयी अन् एकूणच सावरकरांच्या जीवनाविषयी अवहेलना, अपमान पुष्कळ मोठ्या प्रमाणात होतांना दिसतात आणि यातच त्यांचे मोठेपण लपलेले आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगाव, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदूसंघटन’ या विषयावर ते बोलत होते. ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सहस्र पैलू दर्शवणार्‍या व्याख्यानमालेतील हे एकादश व्याख्यानपुष्प होते.

श्री. सुनील घनवट

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांच्या व्याख्यानातील अन्य महत्त्वाची सूत्रे

१. अतिशय निर्भय हजरजबाबी, राष्ट्रप्रेमी आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी लिहिलेले वाङ्मय आणि काव्ये हा चमत्कार आहे.

२. दिवसभर कोलू ओढून आल्यावर बेशुद्ध होइपर्यंत शारीरिक, मानसिक रीतीने थकल्यानंतर, भिंतीवर टोकदार वस्तूने काव्य कोरायचे आणि ते ११ वर्षानंतर पुन्हा आठवून लिहून काढणे, हे अजब आहे. त्यांना राष्ट्रभाषेविषयी जाज्वल्य अभिमान होता. परकीय भाषेला प्रतिशब्द देण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले.

३. जोपर्यंत देशाचे सैनिकीकरण होत नाही, तोपर्यंत स्वातंत्र्य टिकणार नाही, हे त्यांनी वर्ष १९३७ मध्ये सांगितले; म्हणूनच त्यांना सशस्त्र क्रांतीचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाते.

४. भारताच्या फाळणी नंतर पाकिस्तानचे सैनिक भारताच्या हद्दीत घुसून अचानक आक्रमण करायचे, लोकांना मारायचे, त्या वेळी एकदा मेजर जनरल परांजपे यांच्याशी बोलतांना सावरकर म्हणाले, ‘‘आपले सैनिक कधीतरी चुकून लाहोरपर्यंत जाऊ द्या आणि लाहोरच हातात घ्या.’’

५. ‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’, असे सावरकरांचे ठाम मत होते. आज भारतात प्रतिवर्षी १८ लाखांहून अधिक हिंदू ख्रिस्ती धर्म स्वीकारतात. अंदमानात असतांना कुणीही केवळ स्पर्श केल्याने धर्म बदलत नाही, आपला धर्म एवढा लेचपेचा नाही, असे सावरकरांनी ठासून सांगितले आणि तुरुंगातील हिंदु कैद्यांचे धर्मांतर रोखले. आज मात्र जालंधर येथे जगातील दुसरे मोठे चर्च उभे राहिले आहे. लाखो शीख बांधव धर्मांतरित झाले आहेत. त्यांना पगडीवाला ख्रिस्ती म्हटले जाते. तिथे खलिस्तानची चळवळ जोर धरत आहे, तर आदिवासी भागात ‘भिल्ल टायगर सेना’ आम्ही हिंदु नाही, आम्हाला एक वेगळे भिल्ल स्थान द्या, अशी मागणी करत आहेत.

६. पुन्हा एकदा देशाचे तुकडे होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठीच  सावरकरांनी सांगितले होते की, जोपर्यंत भारतातील शेवटचा मुसलमान पाकिस्तानात जात नाही आणि शेवटचा हिंदु भारतात येत नाही, तोपर्यंत खरी फाळणी होणार नाही. किती हा द्रष्टेपणा !

७. सावरकरांच्या विचाराने चाललो असतो तर आपण ५० वर्षे आधीच स्वतंत्र झालो असतो आणि आज महासत्ता बनलो असतो. सावरकरांचे न ऐकल्यामुळे आज प्रत्येक शहरात मिनी पाकिस्तान निर्माण झाले आहे.

८. जो देश आपला भूतकाळ विसरतो त्याचे भविष्य धोक्यात येते. जर अखंड हिंदुस्तान हवा असेल, तर इतिहास विसरता कामा नये. १० लाख हिंदूंची कत्तल होऊन भारताची फाळणी झाली. त्यानंतरही १९८९ मध्ये लाखो काश्मिरी पंडितांना आपल्याच घरातून नेसत्या वस्त्रनिशी निर्वासित व्हावे लागले.

९. आपल्या हक्काच्या राष्ट्रासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपली फाळणी धर्माच्या आधारावर झाली आहे; म्हणूनच हा देश हिंदु राष्ट्र झाला पाहिजे. आज राजकीय दृष्टीने अनुकूल स्थिती आहे; पण धर्माच्या दृष्टीने देशपातळीवर प्रयत्न करणे, जनआंदोलन उभे करण्याची आवश्यकता आहे.

१०. हिंदु राष्ट्र झाले, तर धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या इत्यादी सर्व समस्या नष्ट होतील. संत, शंकराचार्य सर्वजण सांगत आहेत की, वर्ष २०२५ ला हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे हे निश्चित ! एकीकडे योगी यांनी हलाल जिहादची पाळेमुळे खणून काढायला आरंभ केला आहे. आपण प्रत्येकाने आपले धन, शरीर, वेळ, कौशल्य यांचे आपापल्या परीने योगदान देऊया. कमीतकमी हिंदु राष्ट्रासाठी प्रार्थना तरी करूया. आध्यात्मिक अधिष्ठान ठेवून प्रयत्न करूया. मग सावरकरांच्या स्वप्नातील हिंदु राष्ट्र दूर नाही !