मोदी सरकारच्या काळात देशात दंगलींच्या घटनांमध्ये ४८ टक्क्यांनी घट !

नवी देहली – मोदी सरकारच्या कार्यकाळात देशात घडणार्‍या दंगलींचे प्रमाण ४८ टक्क्यांनी घटले आहे. भाजपशासित राज्यांमध्ये दंगलींचे प्रमाण ९० टक्के अल्प झाले आहे, तर काँग्रेसशासित राज्यांमध्ये ३० टक्के अधिक प्रमाणामध्ये दंगलींची नोंद झाली आहे. गेल्या ५ वर्षांत दंगलींचे प्रमाण अल्प होत चालले आहे. वर्ष २०२२ मध्ये देशभरात सर्वांत अल्प प्रमाणात दंगली झाल्या आहेत. ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा’ने (एन्.सी.आर्.बी.ने) ही माहिती दिली आहे.

सौजन्य : प्राइम पोस्ट 

१. गेल्या ५ वर्षांत दंगलींचे प्रमाण ३५ टक्क्यांनी अल्प झाले आहे. त्याच वेळी, वर्ष २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये दंगलीच्या संख्येत ९.५ टक्क्यांनी घट झाली आहे.

२. २०२१ मध्ये देशात दंगलींची संख्या ४१ सहस्र ९५४ होती, तर २०२२ मध्ये देशात दंगलीच्या केवळ ३७ सहस्र १५७ घटना घडल्या आहेत.

३. भाजपशासित राज्यांनी दंगली अल्प करण्यात आणि कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यात चांगली कामगिरी केली आहे, तर काँग्रेसशासित राज्ये यामध्ये मागे असल्याचे सिद्ध झाले आहे.

४. गेल्या ५ वर्षांत उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश आणि आसाम या राज्यांनी दंगली अल्प करण्यात चांगले यश मिळवले आहे.

काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये दंगलींत वाढ !

वर्ष २०१८ मध्ये छत्तीसगडमध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारच्या काळात दंगली वाढल्या. वर्ष २०१८ मध्ये दंगलीच्या ६६५ घटना घडल्या, तर वर्ष २०२२ मध्ये या घटना ३० टक्क्यांनी वाढून ९६१ झाल्या.

काँग्रेस सरकारच्या तुलनेत भाजप सरकारच्या काळात दंगलींमध्ये ४८ टक्क्यांनी घट !

देशातील दंगलींची आकडेवारी पाहिली, तर असे दिसून येते की, स्वातंत्र्यानंतर देशात दंगलींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वर्ष १९८१ मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना हा आकडा १ लाख १० सहस्र इतका होता. देशातील दंगलींच्या घटनांमध्ये पहिली मोठी घट माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात दिसून आली. त्यानंतर पुन्हा काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यानंतर देशात पुन्हा एकदा दंगली वाढल्या. वर्ष २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यापासून देशातील दंगलींचे प्रमाण सातत्याने न्यून होत आहे. वर्ष २०१३ मध्ये काँग्रेसच्या राजवटीच्या शेवटच्या पूर्ण वर्षात देशात दंगलींची संख्या ७२ सहस्र १२६ होती, जी आता पंतप्रधान मोदी यांच्या राजवटीत जवळपास निम्म्यावर आली आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या काळात देशातील दंगलींच्या घटना सुमारे ४८ टक्क्यांनी अल्प झाल्या आहेत.

संपादकीय भूमिका 

याचाच अर्थ काँग्रेसच्या राज्यात धर्मांधांना हिंदूंवर आक्रमण करण्याची मोकळीक देण्यात आली होती आणि आजही ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, तेथे दंगली होत आहेत. देशाला दंगलमुक्त करण्यासाठी देश काँग्रेसमुक्त करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते !