टोप येथील राष्ट्रीय महामार्गावर एस्.टी. बस उलटली; १५ प्रवासी घायाळ

कोल्हापूर – २६ नोव्हेंबरला रात्री ठाणे येथून चंदगडच्या (कोल्हापूर) दिशेने एक एस्.टी. बस जात होती. २७ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजता टोप येथील बिरदेव मंदिरासमोरील वळणावर बस आली असता बसच्या चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस ओढ्यावरील पुलाच्या संरक्षण कठड्याला धडकून टोप येथील राष्ट्रीय महामार्गावर उलटली. यात १५ प्रवासी घायाळ झाले. घटनास्थळी साहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी तात्काळ धाव घेऊन घायाळ प्रवाशांना उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात भरती केले.

अपघात झाल्याचे कळल्यावर एस्.टी.च्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी पहाणी करून प्रवाशांना रुग्णालयात भरती करण्यास साहाय्य केले, तसेच ‘अपघाताविषयी अधिक माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल’, असे सांगितले.