लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४५ जागा मिळतील ! – चंदशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष

चंदशेखर बावनकुळे

रत्नागिरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ९ वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४५ जागा मिळतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ‘महाविजय २०२४ संकल्प यात्रेसाठी बावनकुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या दौर्‍यावर आले आहेत.

चंदशेखर बावनकुळे पुढे म्हणाले

१. नरेंद्र मोदी यांनी देशाला जगात सर्वोत्तम करण्यासाठी प्रयत्न केला आहे, त्यामुळेच देशातील लोकांना ते पुन्हा पंतप्रधान व्हावेसे वाटतात.

२. आतापर्यंत ३२ सहस्रांहून अधिक लोकांना भेटलो. त्यातील केवळ १३ लोक सोडून अन्य सर्वांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचेच नाव घेतले. राज्यातील ९० टक्के लोक त्यांच्या पाठीशी उभे आहेत.

सौजन्य tv9

३. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भाजप महायुतीचा उमेदवार ५१ टक्के मते घेऊन विजयी होईल.

४. प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ६० सहस्र घरांपर्यंत पोचण्याचा संकल्प असून मोदी यांच्या कार्यकाळातील योजना संपर्क ते समर्थन अशा अभियानातून लोकांपर्यंत पोचवल्या जाणार आहेत.

५. शरद पवार यांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे; मात्र आतंकवादी आक्रमणे कशी असतात ? हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. आतंकवाद्यांचे किती समर्थन करायचे ? हेही त्यांना कळायला हवे. त्यांनी पंतप्रधानांवर जी टीका केली आहे, त्याचा आम्ही निषेध करत आहोत.