जो माणूस भगवंताच्‍या वादळात सावध राहून किंवा मागे-पुढे न पहाता (बेदरकारपणे) झेप घेतो, त्‍याचीच नाव पैलतिराला जाते !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘जीवनात एक क्षण असा येतो की, ज्‍या वेळी झंझावाती वादळ उसळते. ते भगवंताचे वादळ असते. जो माणूस त्‍या क्षणी सावध राहून किंवा वादळात मागे-पुढे न पहाता (बेदरकारपणे) झेप घेतो, तुफानाशी झुंजतो, त्‍याचीच नाव पैलतिराला जाते. ते तुफानच ती नाव पैलतिराला नेते. भगवंताचे तुफान नाव (होडी) बुडवत नाही. भगवंताचे तुफान नाव पैलतीरी पोचवते. त्‍याची गती केवळ भगवानच असते. तोच प्रभु, तोच पोषणकर्ता, तोच साक्षी, तिथेच त्‍याचा निवास, तेच त्‍याचे निधान (ठेवा), तोच आसरा, तोच सखा ! हा क्षण झंझावात ज्‍याच्‍या जीवनात येतो, तोच भाग्‍यवान. बाकीचे सगळे अभागी असतात. असे क्षण येतात, त्‍या क्षणी सावध राहिला, चेतला, तर प्रचंड उपाधी, प्रचंड कटकटी टळतात. तो क्षण घालवला, त्‍या वेळी बेहोश राहिला, तर सगळे जीवन व्‍यर्थ होते. तो प्रचंड कटकटी, व्‍याप, उपाधी आणि संसार यांत अडकतो. तो पिंजर्‍याच्‍या दाराशी असतो. दार उघडेच असते. आत शिरला की, दार बंद होते आणि अडकला. मग अडकतोच. आता त्‍या पिंजर्‍यातून सुटका होणे कठीण असते.’

– गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑगस्‍ट २०२३)