आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍या मुलांची वारस नोंद रहित करणार !

संत दामाजीनगर (तालुका मंगळवेढा) ग्रामपंचायतीचा निर्णय

सोलापूर – आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍या मुलांची वारस नोंद रहित करण्याचा निर्णय संत दामाजीनगर ग्रामपंचायतीने घेतला आहे. अशा मुलांना ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात येणार्‍या सर्व सुविधाही बंद करण्यात येणार आहेत. आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन ३० ऑगस्ट या दिवशी ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. याविषयी परिसरातील सर्व वृद्धाश्रमांना ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रव्यवहार केला जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक किंवा वृद्ध वृद्धाश्रमात आढळल्यास संबंधित मुलावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सरपंच जमीर सुतार यांनी सांगितले. (कुटुंबव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी कायद्याचा बडगा उचलण्याची वेळ येणे, हे समाज अधोगतीकडे जात असल्याचे द्योतक आहे. त्यामुळे मुलांवर भारतीय संस्कृती, परंपरा आणि नीतीमूल्ये यांचे संस्कार वेळीच करणे आवश्यक. – संपादक)