(म्हणे) ‘देवाचा फोन आल्यावर निवडणुकीत किती जागा मिळतील ? हे सांगू !’ – फारूख अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर

फारूख अब्दुल्ला

मुंबई – निवडणुकीत किती जागा जिंकणार ? याविषयी भाजपकडून नेहमीच दावे केले जातात. ते किती जागा जिंकणार ? याविषयी देवाकडून त्यांना संदेश प्राप्त झाला असेल. आम्हाला अद्यापही देवाचा फोन आलेला नाही. देवाचा फोन आला की, आम्ही कळवू, असे विधान ‘जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स’चे नेते आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केले. पुरोगामी आणि निधर्मीवादी पक्षांच्या एकत्रित ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीसाठी फारूख अब्दुल्ला मुंबईमध्ये आले आहेत. या वेळी भाजपकडून लोकसभेच्या निवडणुकीत ३०० जागा जिंकण्याच्या व्यक्त केलेल्या विश्‍वासाविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता अब्दुल्ला यांनी वरील वक्तव्य केले.

या वेळी फारूख अब्दुल्ला म्हणाले, ‘‘देश वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. हा देश आपल्या सर्वांचा आहे. एकता आणि अनेकता महत्त्वाची आहे. अनेकता बळकट असेल, तर एकता मजबूत होईल. भारताच्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला सर्वांना अनेकतेला बळकट करायचे आहे.’’ (काश्मीरमधील फुटीरतावाद्यांची पाठराखण करणार्‍या फारूख अब्दुल्ला यांनी देश वाचवण्याची भाषा करणे, म्हणजे हास्यविनोदच होय ! – संपादक)

संपादकीय भूमिका

देवाशी बोलण्यासाठी भक्त व्हावे लागते. देवाविषयी विनोदबुद्धीने बोलणारे अब्दुल्ला स्वत:च्या श्रद्धास्थानांविषयी असे बोलण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ?