‘सनातन प्रभात’ हे सिद्धांताने चालणारे वृत्तपत्र ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या प्रतिक्रिया

भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

सनातन संस्थेचे कार्य करतांना धर्माच्या प्रचारासाठी आणि हिंदूंमध्ये धर्मनिष्ठा जागृत करण्यासाठी हाती एखादे माध्यम असावे, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ‘सनातन प्रभात’ हे वृत्तपत्र काढले. ‘सनातन प्रभात’ हे न्यायाने, धर्माने आणि सिद्धांतावर चालणारे वृत्तपत्र आहे. धर्माच्या प्रचारासाठी वृत्तपत्र चालवणे, हेच जिकरीचे काम आहे. आजच्या युगात विज्ञापनांविना वृत्तपत्रे चालत नाहीत. अशा स्थितीत नेटाने विज्ञापनाविना वृत्तपत्र चालवायचे, असे अग्नीदिव्य डॉक्टरांनी लीलया पार पाडले. ‘सनातन संस्था’ आणि ‘सनातन प्रभात’ या दोघांचे कार्य चांगले आणि अतिशय उत्तर प्रकारे चालले आहे. त्यांच्या या धर्मकार्याला परमेश्वराचा पाठिंबा आहेच आणि पुढेही मिळत राहील, असा मला पूर्ण विश्वास आहे.

‘सनातन प्रभात’ वाचन करू लागल्यापासून मी जे कार्य करत आहे, ते योग्य आहे, याची मला निश्चिती झाली; कारण मी नेहमीच वैदिक सिद्धांतानुसार माझे जीवन जगत आणि त्याप्रमाणे आचरण करत आलो आहे. सध्याची वर्तमानपत्रांपैकी कुठलेही वर्तमानपत्र सनातन वैदिक धर्माचे सनातन शास्त्रांनुसार विवेचन करत नाहीत. ‘पाश्चात्तीकरण हीच प्रगती आहे’, असे समजले जाते. अशा स्थितीत ‘सनातन प्रभात’ने उत्कृष्ट कार्य चालवले आहे आणि खर्‍या अर्थाने सनातन काय आहे ? धर्म आणि त्यानुसार आचरण काय आहे ? प्रवृत्ती कशी असायला हवी ? हे ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने समजते. त्यामुळे आजच्या काळात ‘सनातन प्रभात’सारख्या वर्तमानपत्राची नितांत आवश्यकता आहे. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ ला २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आमच्याकडून भरभरून शुभेच्छा !