काश्मीरमध्ये जावेद वाणी या भारतीय सैनिकाचे आतंकवाद्यांकडून अपहरण !

भारतीय सैन्यातील सैनिक जावेद अहमद वाणी (डावीकडे)

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमधील कुलमाम जिल्ह्यातील अश्थल गावातील स्वतःच्या घरी ईदच्या सुटीसाठी आलेला भारतीय सैन्यातील सैनिक जावेद अहमद वाणी (वय २५ वर्षे) यांचे जिहादी आतंकवाद्यांनी अपहरण केले. २९ जुलैच्या सायंकाळपासून ते बेपत्ता आहेत. गावापासून काही अंतरावर त्यांची चारचाकी गाडी सापडली असून त्यामध्ये रक्ताचे डाग आणि जावेद यांच्या चपला सापडल्या आहेत. जावेद यांना शोधण्यासाठी भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी संयुक्त अभियान चालू केले आहे.

जावेद २९ जुलैच्या संध्याकाळी किराणा सामान आणण्यासाठी चारचाकी गाडी घेऊन बाहेर पडले होते; मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतलेच नाहीत. जावेद घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी आसपासचा परिसर आणि गावे यांमध्ये त्यांचा शोध घेतला, तेव्हा परानहाल गावात त्यांची गाडी बेवारस स्थितीत सापडली.