पाकने पालटलेली युद्धनीती !

‘वन्दे मातरम्’ न म्हणणार्‍या मुसलमानांना सरकारी (जनतेच्या) पैशातून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणे तात्काळ बंद करा !

आतंकवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी पुणे येथे नुकत्याच पकडलेल्या आतंकवाद्यांकडे मुंबईतील कुलाबा येथील ‘ज्यू कम्युनिटी सेंटर’च्या ‘गूगल इमेजेस’ आढळल्या आहेत. यामुळे पोलिसांनी तेथील सुरक्षा वाढवली आहे. उरी आणि पुलवामा आक्रमणाला भारताने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या नंतर अन् सीमेवरील जिहादी कारवायांना भारतीय सैनिकांनी वेळोवेळी दिलेल्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकच्या आतंकवादी कृत्यांना चाप बसला आहे. यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांवर पाकधार्जिण्या धर्मांधांकडून होणारी दगडफेक पूर्णत: थांबली आहे. भारताच्या सीमा भागांतील पाकच्या आतंकवादी कारवाया मंदावल्याचे दिसत असतांनाच मागील काही दिवसांत अचानकपणे भारतविरोधी अनेक घटना समोर आल्या आहेत. यातून पाकने त्याच्या युद्धनीतीमध्ये पालट केला आहे, हे प्रकर्षाने दिसून येईल. भारताशी प्रत्यक्ष युद्धात टिकाव लागत नसल्यामुळे, तसेच सद्यःस्थितीत सीमा भागात भारतीय सैनिकांचे सक्षमीकरण होत असल्यामुळे पाकने या छुप्या कारवाया चालू केल्या आहेत. यांतील काही कारवाया उघड झाल्या आहेत; मात्र उघड न झालेल्या अनेक कारवाया आणि त्या राबवणारे पाकचे हस्तक हे भविष्यात भारतापुढील मोठे आव्हान ठरणार आहे.

भारताच्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’तील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरूलकर यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवणे, पाकचे संरक्षणविषयक साहाय्यक मलिक अहमद खान यांनी पाकमधून ड्रोनद्वारे भारतात अमली पदार्थ पाठवल्याची स्वीकृती देणे, उत्तरप्रदेशमध्ये ‘ऑनलाईन गेमिंग’द्वारे चालू असलेल्या धर्मांतराचे धागेदोरे पाकिस्तानमध्ये असल्याचे आढळणे, प्रियकरासाठी भारतात आल्याचे भासवणारी पाकची हस्तक सीमा हैदर आणि नुकतेच पुणे येथे सापडलेले आतंकवादी या सर्व घटना पहाता पाकच्या भारतविरोधी कारवाया विविध पातळीवर चालू आहेत अन् त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. हे युद्ध आता केवळ सीमा भागापुरते मर्यादित राहिलेले नसून आपल्या आजूबाजूला पाकचे हस्तक असल्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या काही कालावधीत त्याचा परिणाम दिसण्याची शक्यता सध्याच्या घडामोडींवरून दिसत आहे.

…यातून कुणाला संदेश ?

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी ‘इस्लाममध्ये स्वत:च्या आईपुढेही झुकण्याला अनुमती नाही’, असे सांगत ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास नकार दिला. त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभेत हे ठामपणे सांगूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही ? याहून लोकशाहीची थट्टा ती काय ? अबू आझमी असे बोलतात आणि देशातील एकाही मुसलमानाने ‘त्यांनी मांडलेली भूमिका आम्हाला मान्य नाही’, असे म्हटलेले नाही. यापूर्वी जेव्हा महाराष्ट्रात औरंगजेबाचे उदात्तीकरण झाले, त्या वेळीही ‘औरंगजेब आमचा आदर्श नाही’, असे कुणा मुसलमानाने म्हटल्याचे ऐकिवात नाही. ‘वन्दे मातरम्’ न म्हणणे, औरंगजेबाचा आदर्श बाळगणे या दोन्ही घटना केवळ हिंदूंसाठी नव्हे, तर कुणाही राष्ट्रप्रेमी नागरिकाला पचणार्‍या नाहीत. त्यामुळे अशा घटना निश्चितच देशात हिंदू आणि मुसलमान यांच्यात दरी निर्माण करणार्‍या आहेत. देशातील आतंकवादी कारवायांमध्ये स्थानिक धर्मांधांचा प्रत्यक्ष सहभाग आढळत असतांना उघडपणेही इस्लामपुढे राष्ट्रवंदनाला दुय्यम स्थान देणारे भविष्यात जिहादी कारवायांना साथ देणार नाहीत, याची शाश्वती कोण देणार ? पाकचे हस्तक जेव्हा भारतात कारवाया करतील, तेव्हा ते निश्चित अशा धर्मांधांना मोहरे बनवतील, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. भविष्यात देशातील गृहकलहाच्या धोक्याची ही घंटा आहे. औरंगजेबाच्या उदात्तीकरणाला मूकसंमती देणारे मुसलमान भविष्यात काय करतील, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

मुसलमानांचे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण परवडेल का ?

केंद्रात काँग्रेसच्या डॉ. मनमोहन सिंह यांचे सरकार असतांना मुसलमानांसाठी जी १५ कलमी योजना आणली, त्यामध्ये मुसलमान युवकांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाते. ही योजना महाराष्ट्रातही राबवली जात आहे. यामध्ये अल्पसंख्यांक म्हणजेच ज्यू, पारशी, जैन, ख्रिस्ती यांचाही समावेश आहे; मात्र त्यांची संख्या अत्यंत मर्यादित असल्यामुळे या योजनेचा सर्वाधिक लाभ मुसलमान विद्यार्थ्यांना मिळत आहे. या योजनेतून प्रशिक्षित झालेले मुसलमान युवक जेव्हा महाराष्ट्र पोलिसांत सहभागी होतील आणि ते ‘वन्दे मातरम्’ न म्हणणारे, औरंगजेबाला आदर्श मानणारे असतील, तर काय होईल ?’, याचा धोका वेळीच लक्षात घ्यायला हवा. अबू आझमींसारखे नेते ‘राष्ट्रनिष्ठेपेक्षा इस्लामी कट्टरतावाद जोपासतात’, अशा धर्मांध विचारांचे मुसलमान या योजनेचा लाभ घेऊन पोलीसदलात उच्च पदावर नियुक्त झाले, तर ते कट्टरतावादी धर्मबांधवांना साथ न देता राष्ट्रहिताला प्राधान्य देतील का ? याची शाश्वती कोण देणार ? त्यामुळे पोलीसदलासारख्या संवेदनशील क्षेत्रात देण्यात येणारे पूर्व प्रशिक्षण केंद्र आणि राज्य सरकारने बंद करायला हवे.

डॉ. प्रदीप कुरूलकर यांना अडकवणारा ‘हनी ट्रॅप’ असो किंवा सीमा हैदर हिचा भारतप्रवेश असो, हे सर्व प्रकार भारतातील पाकच्या हस्तकांविना शक्य नाहीत. हे हस्तक जेव्हा पुण्यासारख्या शहरात आढळतात, तेव्हा ते निश्चितच केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील कोणत्याही गल्लीबोळात शिरले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आझाद मैदानावरील दंगलीच्या वेळी महिला पोलिसांचे कपडे फाडायला मागे पुढे न पहाणारे आणि ‘अमर जवान स्मारका’लाही लाथ मारणारे भविष्यात हिंदू-मुसलमान वाद उद्भवल्यास कोणत्या थराला जातील ? याचा हिंदू, पोलीस आणि प्रशासन यांनीही गांभीर्याने विचार करावा.