वर्तमान राजकीय परिस्थितीने छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे संपूर्ण देशात हसे केले ! – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

चिपळूण, १३ जुलै (वार्ता.) – देवेंद्र फडणवीस म्हणतात मी राजकारणी आहे आणि राजकारणात असले निर्णय घ्यावे लागतात; मात्र मी काँग्रेससोबत जाणार नाही. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय वेगळा पक्ष आहे का? खरेतर यांना राज्याच्या भूत-भविष्याशी काहीही देणे-घेणे नाही; मात्र महाराष्ट्रातील जनतेने विचार करायला हवा. तुम्ही कुणाचे वारस आहात ? या भूमीतील शूरांनी देशावर राज्य केले आहे. त्यांनी या देशातील जनतेला कसे वागावे ? कसे बोलावे ? कसे रहावे ?, हे शिकवले.

आज त्याच राज्यातील राजकीय परिस्थिती पाहून ‘महाराष्ट्रातील जनता किती वेडी आहे. असले राजकारणी निवडून आणते’, अशी प्रतिक्रिया देशात व्यक्त होत आहे. वर्तमान राजकीय परिस्थितीने छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे संपूर्ण देशात हसे केले आहे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. शहरातील अतिथी सभागृहात आयोजित मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

या वेळी व्यासपिठावर मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, वैभव खेडेकर आदी उपस्थित होते. शेकडो मनसे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. काही नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.  येणार्‍या निवडणुकींना कसे सामोरे जायचे , याविषयी नेत्यांचे मार्गदर्शन झाले.

संपूर्ण महाराष्ट्रात लुटमार चालू आहे  जिल्ह्यातील नाणारचा प्रकल्प ५ दिवसांत बारसूला हालवला जातो. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला लागणारी जमीन ५ दिवसांत कुठून मिळाली? या जमिनी कुणाच्या आहेत ? याचा कुणी कधी विचार केला आहे का ? आज अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात लुटमार चालू आहे.

मुंबई -गोवा महामार्ग वेळेत पूर्ण व्हावा यासाठी किती खासदारांनी प्रयत्न केले ?

महाराष्ट्राची आर्थिक गळचेपी होते; म्हणून या राज्यातील केंद्रीय अर्थमंत्री असणारे सी.डी. देशमुख यांनी त्यागपत्र दिले होते; मात्र गेली १६ वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. किती खासदारांनी त्यासाठी प्रयत्न केले. मग त्यांचे काम काय आहे ? त्यांना का निवडून द्यायचे ? याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.