हिंदूंनी संघटित होऊन समाजाला जागृत करणे आवश्‍यक – डॉ. राजेंद्र दीक्षित, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

नागपूर येथे गुुरुपौर्णिमा महोत्‍सव

डॉ. राजेंद्र दीक्षित, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

नागपूर – आज सर्वत्र समाज विघटित करणार्‍या शक्‍ती कार्यरत आहेत. त्‍या समाजाला दिशाहीन करण्‍याचे कार्य करतात. ते मोडून काढण्‍यासाठी सगळ्‍या हिंदूंंनी संघटित होऊन समाजाला जागृत करण्‍याची आवश्‍यक आहे. परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सनातन संस्‍थेच्‍या माध्‍यमातून समाज जागृती आणि संघटन, तसेच समाजातील प्रत्‍येक घटक आनंदी व्‍हावा, यासाठी समाजाला साधनेची दिशा देण्‍याचे कार्य हाती घेतले आहे. या कार्याचे अतिशय उत्तम नियोजन त्‍यांनी केले आहे. आजच्‍या काळात इतके सुंदर नियोजन बघून मला पुष्‍कळ आश्‍चर्य वाटले आणि आनंद झाला, असे उद़्‍गार अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे डॉ. राजेंद्र दीक्षित यांनी महाल येथील गुरुपौर्णिमा महोत्‍सवात उपस्‍थितांना संबोधन करतांना काढले. सनातन संस्‍थेच्‍या वतीने ३ जुलै या दिवशी नागपूर येथे स्‍व. तेजसिंहराव भोसले सभागृह, तुळसीबाग, महाल आणि श्रीराम मंदिर, बाजीप्रभू देशपांडे चौक, रामनगर या ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्‍सव भावपूर्ण वातावरणात साजरा झाला.

‘आज सगळ्‍या बाजूने हिंदु धर्मावर आघात होत आहेत. त्‍यातही युवा वर्ग दिशाहीन आहे. त्‍यांना धर्मशिक्षण देऊन दिशादर्शन करण्‍याचे दायित्‍व आपल्‍या प्रत्‍येकाचे आहे’, असे प्रतिपादन ‘चित्‍पावन ब्राह्मण संघा’चे श्री. उमाकांत रानडे यांनी केले. रामनगरच्‍या गुरुपौर्णिमा महोत्‍सवात ते बोलत होते.

श्री. उमाकांत रानडे

दोन्‍ही ठिकाणी महोत्‍सवाच्‍या प्रारंभी श्री व्‍यासपूजा आणि प.पू. भक्‍तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्‍यात आले. या कार्यक्रमाला समाजातील मान्‍यवरांसह जिज्ञासू उपस्‍थित होते. दोन्‍ही ठिकाणी प्रथमोपचार कक्ष, सनातनच्‍या सात्त्विक उत्‍पादनांचा कक्ष, ग्रंथप्रदर्शन तसेच राष्‍ट्र, धर्म विषयक जागृती करणारे आणि साधनेविषयी मार्गदर्शन करणारे फ्‍लेक्‍स प्रदर्शन लावण्‍यात आले होते.

क्षणचित्रे 

१. डॉ. राजेंद्र दीक्षित यांनी देवघराच्‍या मांडणीविषयी जाणून घेतले, त्‍याचे छायाचित्र काढले आणि ‘मी घरी अशीच रचना करणार’, असे सांगितले.

२. डॉ. दीक्षित आणि श्री. रानडे यांनी मार्गदर्शन करतांना रामनाथी आश्रमातील व्‍यवस्‍थापनाविषयी गौरोवोद़्‍गार काढले.