बिहारमध्ये गोतस्करांना पकडणार्‍या गोरक्षकांवर दरोड्याचा गुन्हा नोंदवला जातो ! – आचार्य चंद्र किशोर पाराशर, संस्थापक, आंतरराष्ट्रीय सनातन हिंदु वाहिनी

( प्रतिकात्मक छायाचित्र )

रामनाथी, २२ जून (वार्ता.) – आमच्या मुझफ्फरपूर शहराचे नाव मला नेहमी खटकायचे. त्यामुळे वर्ष १९८० मध्ये ते पालटण्यासाठी काही समविचारी मित्र आणि संस्था यांची एक बैठक घेतली. त्यात शहराचे नाव पालटायचे ठरवले. मुझफ्फरपूर हे लिची या फळांसाठी प्रसिद्ध आहे. शहराची ६ लाख लोकसंख्या असून त्यात ५० सहस्र मुसलमान आहेत. तेथे अनेक पशूवधगृह आहेत. ते बंद करण्याचा प्रयत्न केला; परंतु तेथील प्रशासन आणि पोलीस यांच्याशी पशूवधगृहांची मिलीभगत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. शहरात अन्न प्रक्रिया उद्योग आहेत. त्या नावावर तेथे रात्रीच्या वेळी गोमांसाचे ‘पॅकिंग’ केली जाते.

( प्रतिकात्मक छायाचित्र )

आम्ही केंद्र सरकारच्या अधिकार्‍यांचे साहाय्य घेऊन एका रात्रीत ५०० टन गोमांस पकडले. हे सर्व कार्य आमच्या १५ ते २० संघटनांच्या समन्वय समितीकडून केले जाते. गोतस्करी थांबवतांना आमच्यावर दरोड्याचे गुन्हे लावण्यात येतात. दुर्दैवाने या कार्यासाठी जनता पुढे येत नाही. एक पशूवधगृह बंद झाल्यावर ते दुसर्‍या ठिकाणी चालू करण्यात येते, असे संतप्त उद्गार उत्तरप्रदेशातील ‘आंतरराष्ट्रीय सनातन हिंदु वाहिनी’चे संस्थापक आचार्य चंद्र किशोर पाराशर यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सातव्या दिवशी (२२.६.२०२३ या दिवशी) उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना संबोधित करत होते.

आचार्य चंद्र किशोर पाराशर, संस्थापक, आंतरराष्ट्रीय सनातन हिंदु वाहिनी

ते पुढे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी विचारांच्या साहित्यिकांना योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी आमच्या समन्वय समितीने प्रसिद्ध साहित्यिक दिनकर यांच्या नावाने अकादमी स्थापन केली. या अकादमीच्या वतीने प्रतिवर्षी ३ दिवस संमेलनाचे आयोजन केले जाते. अलीकडे बिहारच्या नौबतपूरमध्ये बागेश्वर धाम महाराजांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला बिहार शासनाकडून विरोध झाला. तेव्हा त्यांच्या कार्यक्रमासाठी येथील शेतकर्‍यांनी त्यांची पिक असलेली १ सहस्र ५०० एकर भूमी सपाट करून दिली.’’

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवामध्ये आल्यावर माझी उर्जा ५ पट वाढल्याचे जाणवले. जेव्हा मी परमपूज्य गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना) भेटलो, तेव्हा ही उर्जा १० पट वाढल्याचे लक्षात आले.’ – आचार्य चंद्र किशोर पाराशर, संस्थापक, आंतरराष्ट्रीय सनातन हिंदु वाहिनी