(म्हणे) ‘आम्ही (मुसलमानांनी) हातात बांगड्या भरलेल्या नाहीत !’ – मौलाना तौफीर रझा

उत्तराखंडमध्ये मुसलमानांच्या कथित पलायनावर ‘इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल’चे अध्यक्ष मौलाना तौफीर रझा यांची धमकी !

‘इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल’चे अध्यक्ष मौलाना तौफीर रझा

बरेली (उत्तरप्रदेश) – उत्तराखंडमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या घटनेनंतर तेथील उत्तरकाशीतील मुसलमान व्यापार्‍यांना त्यांची दुकाने बंद करून जाण्यास सांगणारी भित्तीपत्रके लावण्यात आल्यानंतर काही दुकानदार तेथून निघून गेले आहेत आणि जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिलचे अध्यक्ष मौलाना (इस्लामी अभ्यासक) तौफीर रझा यांनी उत्तरखंडच्या भाजप सरकारला धमकी दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही बांगड्या भारलेल्या नाहीत. जर सरकार या घटनेच्या संदर्भात कारवाई करणार नसेल, तर आम्ही उत्तराखंडमध्ये जाऊन सरकारला घेराव घालू. आम्ही आमच्या मशिदी, मजार (मुसलमानाचे थडगे) आणि मदरसे यांवर बुलडोजर चालवू देणार नाही.

१. मौलाना रझा पुढे म्हणाले की, उत्तराखंडमध्ये जे काही चालले आहे, ते संपूर्ण देशात करण्याचा विचार होत आहे. तेथे हिंदु महापंचायत बोलावण्यात आली होती; मात्र ती स्थगित करण्यात आली. जर मुसलमानांनी महापंचायतीची घोषणा केली नसती, तर प्रशासनाने हिंदु महापंचायत स्थगित केली नसती. आम्हाला कृतीवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास बाध्य केले जाऊ नये. सरकारला योग्य निर्णय घेता आले पाहिजे, अन्यथा देशातील वातावरण बिघडू शकते. हिंदुत्वनिष्ठ संघटना हेच करत आहेत. ते देशद्रोही आहेत. (हिंदुत्वनिष्ठांना देशद्रोही म्हणणार्‍यांनी लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि थूंक जिहाद करणारे कोण आहेत, हेही रझा यांनी सांगावे ! – संपादक)

२. हिंदु राष्ट्राविषयी मौलाना रझा म्हणाले की, ज्या संघटना हिंदु राष्ट्राविषयी बोलत आहेत, त्या देशद्रोही आहेत. या लोकांवर सरकारने कारवाई केली पाहिजे.

संपादकीय भूमिका

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! आधी लव्ह जिहाद करायचे आणि त्याला विरोध झाल्यावर अशा धमक्या द्यायच्या. अशा मानसिकेच्या लोकांवरही पोलिसांनी कारवाई करणे आवश्यक आहे !