महाराष्‍ट्र विदेशी गुंतवणुकीत पुन्‍हा क्रमांक एक वर ! – मुख्‍यमंत्री

पालघर (जिल्‍हा ठाणे) येथे ‘शासन आपल्‍या दारी’ उपक्रमाचा कार्यक्रम !

पालघर येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर (जिल्‍हा ठाणे) – देवेंद्रजी यांच्‍या नेतृत्‍वात परकीय गुंतवणुकीत महाराष्‍ट्र क्रमांक एकवर होता. आता पुन्‍हा तो क्रमांक १ वर आला आहे. पंचामृत अर्थसंकल्‍पाचा लाभ सर्वांना झाला आहे. आतापर्यंत ३५ लाख लाभार्थ्‍यांपर्यंत आमचे शासन पोचले. पालघरमध्‍ये २ लाख १२ सहस्र ६८३ लाभार्थ्‍यांना २१२ कोटी रुपयांचा लाभ होणार आहे. आतापर्यंत सरकारने ४०० निर्णय घेतले. रोजगार मेळाव्‍यातून १ सहस्र ८०० तरुणांना रोजगार दिला. शेतकर्‍यांना पावसाची हानीभरपाई १ सहस्र ५०० कोटी रुपयांपर्यंत गेली. नागपूर-मुंबई हा ‘गेमचेंजर’ प्रकल्‍प आहे, अशी माहिती मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पालघर येथे ‘शासन आपल्‍या दारी’ या योजनेअंतर्गत लाभार्थ्‍यांना लाभ देण्‍यासाठी आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात ते बोलत होते.

 

या वेळी उपमुख्‍यमंत्री फडणवीस म्‍हणाले, ‘‘पूर्वीचे सरकार घरी बसून होते. आता ‘शासन आपल्‍या दारी’ येऊन लाभ देत आहे. लाभ घेण्‍यासाठी कुणालाही खेटे घालण्‍याची आवश्‍यकता नाही. योजनांचे लाभ शेवटच्‍या व्‍यक्‍तीपर्यंत पोचण्‍यासाठी पंतप्रधान मोदी यांनी वितरणव्‍यवस्‍था पालटली. लाभार्थ्‍यांपर्यंत लाभ स्‍वतः पोचेल. कोणी ‘दलाली’ आणि ‘लाभ’ घेऊ शकत नाही. पंतप्रधानांनी ५ सहस्र कोटी रुपये आरोग्‍याच्‍या पायाभूत सुविधांसाठी दिले आहेत. त्‍यातून आता इथे अद्ययावत् रुगणालय आणि वैद्यकीय महाविद्यालय चालू करणार आहोत. महाराष्‍ट्रात महात्‍मा फुले योजने अंतर्गत सरकार ५ लाखांपर्यंत विनामूल्‍य उपचार आणि पंतप्रधान जनआरोग्‍य योजनेत ५ लाखांपर्यत विनामूल्‍य उपचार मिळू शकणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात घरे बांधण्‍यात येत आहेत. शबरी योजनेच्‍या अंतर्गत आदिवासी आणि भटक्‍या विमुक्‍त जमाती यांसाठी ५ लाख घरे बांधण्‍यात येणार आहेत.’’