अमरनाथ यात्रेला १ जुलैपासून प्रारंभ

श्रीनगर – अमरनाथ यात्रेला १ जुलै पासून प्रारंभ होणार आहे. ही यात्रा ६२ दिवस चालणार आहे. ३१ ऑगस्ट २०२३ या दिवशी यात्रेची सांगता होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ९ जून २०२३ या दिवशी घेतलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत यात्रेसाठी केलेल्या सुरक्षा सिद्धतेचा आढावा घेतला. या बैठकीत जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल आणि सुरक्षायंत्रणांचे प्रमुख सहभागी झाले होते. ‘श्री अमरनाथ श्राईन बोर्ड’ने यात्रेच्या कालावधीत अनेक खाद्यपदार्थांच्या वापरावर बंदी घातली आहे.

अमरनाथ यात्रा अत्यंत दुर्गम पहाडी रस्त्यांवरून जाते. गेल्या काही वर्षांपासून या यात्रेला आतंकवादी लक्ष्य करत आहेत. (अमरनाथ यात्रेच्या रस्त्यांवर आतंकवाद्यांच्या आक्रमणाचे सावट असणे, हे लज्जास्पद होय ! – संपादक) त्यामुळे या कालावधीत अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. यात्रेकरूंना तुकड्यांमध्ये पाठवले जाते.