पावसाळ्यात २-३ राष्ट्रे पाण्यात बुडणार ! – श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामीजी, पिठाध्यक्ष, कोडी मठ

कर्नाटकातील कोडी मठाचे पिठाध्यक्ष श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामीजी यांची भविष्यवाणी

कोडी मठाचे पिठाध्यक्ष श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामीजी

सिरसी (कर्नाटक) – भारतावरील गंडांतर टळले नसून देशाला त्याला सामोरे जावे लागणार आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असून यामध्ये २-३ राष्ट्रे पाण्यात बुडणार आहेत. बाँब आक्रमणाने देशाची हानी होणार आहे, असे भविष्य राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यात असलेल्या कोडी मठाचे पिठाध्यक्ष श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामीजी यांनी वर्तवले आहे.

या आधीही कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात भविष्य सांगतांना ते म्हणाले होते की, एकच राजकीय पक्ष सत्ता स्थापित करील. तसेच यावर्षी मोठा अपघात होईल. त्यानुसार कर्नाटकात काँग्रेसने एकहाती स्पष्ट बहुमत घेऊन सत्ता स्थापन केली. तसेच ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात किमान २८० जण मृत्यूमुखी पडले. यामुळे स्वामीजींनी आतापर्यंत सांगितलेली भविष्यवाणी सत्य ठरली आहे, असे सांगण्यात येत आहे.

सिद्धरामय्या धर्म सोडून वागल्यास देवच उत्तर देईल !

सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटकातील सरकारविषयी बोलतांना स्वामीजी म्हणाले की, राज्यात जे धर्मानुसार वागत आहेत, त्यांचे भले होईल; परंतु मुख्यमंत्री सिद्धरामय्या धर्म सोडून वागले, तर देवच त्यांना उत्तर देईल !

गोहत्याबंदी कायदा उठवण्याचे राज्यातील विविध मंत्र्यांनी सुतोवाच केले आहे. त्यानुषंगाने स्वामीजी यांनी केलेले भविष्य महत्त्वपूर्ण असल्याचे बोलले जात आहे.