भूमीच्या वादातून थोरल्या भावाकडून सख्ख्या धाकट्या भावाची हत्या

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, १५ एप्रिल (वार्ता.) – वडिलोपार्जित भूमीवरून न्यायालयात चालू असलेल्या खटल्याच्या पार्श्‍वभूमीवर कोरेगाव तालुक्यातील किन्हईजवळ गणेशवाडी येथे थोरल्या भावाने सख्ख्या धाकट्या भावाची हत्या केली.

संभाजी घाडगे आणि राजाराम घाडगे यांच्यात वडिलोपार्जित भूमीवरून न्यायालयात खटला चालू आहे. दोघांमध्ये सतत वाद होतात. मागील भांडणाचा राग मनात धरून संभाजी घाडगे यांनी राजाराम घाडगे यांच्या डोक्यात नारळ सोलण्याच्या यंत्राची उलटी बाजू मारली. हा फटका एवढ्या जोरात होता की, राजाराम भूमीवर कोसळले आणि त्यांच्या डोक्यातून अन् तोंडातून रक्तस्राव होऊ लागला. ग्रामस्थांनी हा प्रकार पाहिल्यानंतर गर्दी केली, तसेच रुग्णवाहिकेला बोलावलो. उपचारासाठी त्यांना क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र उपचार चालू असतांना त्यांचे निधन झाले. पत्नी सुरेखा यांनी संभाजी घाडगे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून संभाजी घाडगे यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंद झाला आहे.

संपादकीय भूमिका

रागाला नियंत्रणात ठेवण्यासाठी नामजपादी साधना करणे आवश्यक !