देशातील हिंदू आता जागृत झाला आहे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सावरकर गौरव यात्रेत उपस्थितांना संबोधित करतांना

मुंबई – काही जण जाणीवपूर्वक हिंदुत्वाची अपकीर्ती करण्याचे काम करत आहेत.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार रोखण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे; परंतु देशातील हिंदू आता जागा झाला आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकर गौरव यात्रेत केले. मुंबई आणि ठाणे येथे २ एप्रिल या दिवशी ही यात्रा काढण्यात आली. दादर येथे उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.

या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या क्रांतीकारकांच्या बलीदानामुळे आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. सावरकर राष्ट्रभक्त आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ होते. त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ही यात्रा काढली आहे. पूर्वी लोक ‘हिंदुत्व’ हा शब्द उच्चारायला कचरत होते; परंतु वर्ष २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हिंदुत्वाचा सन्मान झाला. हिंदू आता सक्रीय होत आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते; मात्र बाळासाहेबांचा वारसा सांगणारे लोक आता राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्या राहुल गांधी यांनी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला, त्यांच्या समवेत बसण्याचे पाप काही लोक करत आहेत, हे आपल्या राज्याचे दुर्दैव आहे; परंतु आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान खपवून घेणार नाही.’’