‘वंदे भारत’ एक्सप्रेसवर दगडफेक करणार्‍यांना होणार ५ वर्षांची शिक्षा !

नवी देहली – रेल्वेगाड्यांवर दगडफेक करणे हा गुन्हा आहे. रेल्वे कायद्याच्या १५३व्या कलमानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये ५ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. भारतात ‘वंदे भारत’ एक्सप्रेस चालू झाल्यापासून प्रवाशांसाठी प्रवास अतिशय सोपा आणि आरामदायी झाला आहे; पण जसे केंद्र सरकार ‘वंदे भारत’ एक्सप्रेस अधिक मार्गांवर चालू करत आहे, तसे या एक्सप्रेसवर दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याविषयी दक्षिण मध्य रेल्वेने नुकतीच चेतावणी दिली आहे की, ‘वंदे भारत’ एक्सप्रेसवर दगडफेक करणार्‍यांना ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

‘वंदे भारत’ एक्सप्रेसवर दगडफेक केल्याच्या प्रकरणी रेल्वे संरक्षण दलाने आतापर्यंत ३९ गुन्हेगारांना अटक केली आहे. दक्षिण पश्‍चिम रेल्वेच्या बेंगळुरू विभागात जानेवारी २०२३ मध्ये दगडफेकीची २१ आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये १३ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.