वारी मार्गातील मुक्‍काम तळावर सुविधा उपलब्‍ध करून देण्‍याची वारकर्‍यांची मागणी !

प्रतिकात्मक छायाचित्र

आळंदी (जिल्‍हा पुणे) – संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी महामार्गावर रस्‍ता रुंदीकरण आणि विकासकामांत मागील वर्षापासून वेग मंदावला आहे. सोहळ्‍याच्‍या कालावधीत पालखी मार्गावर उड्डाणपुलाच्‍या कामाजवळ सेवा रस्‍ता आणि मुक्‍कामाच्‍या तळावरील जागेत वारी चालू होण्‍यापूर्वी जलदगतीने सुविधा उपलब्‍ध होणे अपेक्षित असल्‍याचे आळंदी देवस्‍थानचे व्‍यवस्‍थापक ज्ञानेश्‍वर वीर यांनी सांगितले. आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी महामार्गाची पहाणी करण्‍यासाठी आळंदी देवस्‍थानचे प्रमुख विश्‍वस्‍त योगेश देसाई, सोहळ्‍याचे मालक ह.भ.प. बाळासाहेब आरफळकर, विहिंपचे जिल्‍हाध्‍यक्ष भागवत चवरे यांच्‍यासह विविध ठिकाणचे तालुका प्रशासन उपस्‍थित होते.

वीर यांनी सांगितले की, पालखी महामार्गात जागा गेल्‍याने या रिंगणासाठी जागा अपुरी पडत आहे. शासनाने रिंगणासाठी वाढीव जागा उपलब्‍ध करून द्यावी. विविध ठिकाणी चालू असलेल्‍या उड्डाणपुलाच्‍या कामामुळे दिंड्या आणि दिंड्यांची वाहने मुक्‍कामाच्‍या ठिकाणी पोचायला विलंब होणार आहे. उड्डाणपुलाच्‍या बाजूने काढलेला पर्यायी मार्ग लहान आहे. परिणामी सेवा रस्‍त्‍याची आवश्‍यकता आहे. सासवड नातेपुते प्रस्‍तावित जादाचा पालखी तळ भूसंपादन, जेजुरी तळावर संरक्षक भिंत, लोणंद वेळापूरचे शौचालय तातडीने होणे आवश्‍यक आहे.

संपादकीय भूमिका

अशी मागणी वारकर्‍यांना का करावी लागते ? प्रशासन स्‍वतःहून सुविधा उपलब्‍ध करण्‍याकडे लक्ष का देत नाही ?