‘एच्.३ एन्.२’ तापाने महाराष्ट्र बाधित न होण्यासाठी सरकारने तात्काळ उपाययोजना करावी ! – विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

अजित पवार

मुंबई, १३ मार्च (वार्ता.) – केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नीती आयोगाच्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ‘एच्.३ एन्.२’ तापाच्या संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या ‘एच्.३ एन्.२’ तापाचा प्रसार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढत आहे. तरी या आजाराने महाराष्ट्र बाधित होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी १३ मार्च या दिवशी विधानसभेत केली.

‘एच्.३ एन्.२’ तापाच्या प्रकारातील शीतज्वराची महाराष्ट्रासह देशात लाट आलेली आहे. वातावरणातील पालट आणि धुळीचे प्रमाण यामुळे ही साथ वाढली असल्याचे तज्ञांचे मत आहे. सर्दी, तीव्र खोकला, ताप, अंगदुखी याशिवाय मळमळ, उलट्या आणि अतीसार अशी लक्षणे रुग्णांमध्ये आठवडाभर रहात आहेत. नुकतेच कर्नाटक आणि हरियाणा राज्यांत या ‘एच्.३ एन्.२’ तापामुळे २ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्या असून ५ वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला याशिवाय हृदयरोग, मधूमेह आणि दम्याच्या रुग्णांना याची लवकर लागण होत आहे. यामुळे गर्दीच्या ठिकाणी ‘मास्क’ वापरण्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आवाहन केलेले आहे. राज्यातही ‘एच्.३ एन्.२’ चे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ‘कोव्हिड-१९’ साथ रोगाचा अनुभव विचारात घेता झपाट्याने वाढलेले प्रमाण आणि वाढलेली रुग्णसंख्या यांचा विचार करता राज्यशासनाने ‘एच्.३ एन्.२’ विषयी योग्य उपाययोजना करावी.