संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये तुर्कीयेने काश्मीरप्रश्‍नी पाकची ‘री’ ओढली !

भारताने तुर्कीयेला सुनावले !

भारताच्या प्रतिनिधी सीमा पुंजानी

नवी देहली –  भारत जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे, असा आरोप तुर्कीयने पाक आणि इस्लामी देशांच्या संघटना यांच्या बरोबरीने केला. त्यावर भारताने पाकिस्तान, इस्लामी देशांची संघटना आणि तुर्कीये या तिघांनाही सडतोड उत्तर दिल्याची घटना संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये घडली.

१. या परिषदेमधील भारताच्या प्रतिनिधी सीमा पुंजानी यांनी भारतावरील आरोपावर उत्तर देतांना म्हटले की, सामान्य जनतेचे जीवन आणि त्यांचा चरितार्थ यांसाठी संघर्ष करणारा पाकिस्तान भारताच्या मागे लागला आहे. यावरून त्याचे प्राधान्य चुकीचे कसे आहे, हे लक्षात येते. मी पाकच्या नेतृत्वाला आणि अधिकार्‍यांना सांगू इच्छिते की, अशा प्रकारचा आधारहीन प्रचार करण्याऐवजी पाकमधील जनतेच्या हितासाठी ऊर्जा खर्च करावी.

२. पुंजानी यांनी तुर्कीयेविषयी म्हटले की, आम्हाला भारताच्या अंतर्गत प्रकरणात तुर्कीयेकडून करण्यात आलेल्या विधानामुळे दुःख झाले आहे. माझा सल्ला आहे की, तुर्कीयेने अशा प्रकारची विधाने करण्यापासून स्वतःला रोखावे.

३. पुंजानी पुढे म्हणाल्या की, इस्लामी देशांच्या संघटनेकडून करण्यात येणारी काश्मीरविषयीची विधाने फेटाळण्यायोग्यच आहेत. या संघटनेने म्हटले पाहिजे होते, ‘पाकने आतंकवादाच्या निर्मितीपासून दूर राहिले पाहिजे आणि भारताच्या भागावर अवैधरित्या मिळवलेले नियंत्रण सोडले पाहिजे.’

४. काश्मीरविषयी पुंजानी म्हणाल्या की, पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग असून तो कायम राहील. पाकनेच भारताच्या भागावर अवैध नियंत्रण ठेवलेले आहे. पाकिस्तान त्याच्या आतंकवादी कारखान्यापासून दुर्लक्ष होण्यासाठी निराधार गोष्टी करत असतो.

संपादकीय भूमिका 

  • याला म्हणतात कुत्र्याची शेपटी किती सरळ करण्याचा प्रयत्न केला, तरी ती वाकडीच रहाते ! भारताने भूकंपाच्या काळात तुर्कीयेला साहाय्य करूनही तो अजूनही पाकच्याच नादी लागलेला आहे, हे स्पष्ट होते !
  • तुर्कीयेसारख्या भारतद्वेषी देशांना आतापर्यंत करण्यात आलेले साहाय्य पुरे असून आता त्यांना भारताने भीक घालू नये, असेच जनतेला वाटते !