बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया ‘वॉटर टॅक्‍सी’ सेवेचा शुभारंभ !

नवी मुंबई, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – महाराष्‍ट्र सागरी मंडळाच्‍या वतीने चालू करण्‍यात आलेल्‍या बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावरील ‘वॉटर टॅक्‍सी’ सेवेचा शुभारंभ बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्‍या हस्‍ते बेलापूर जेट्टी येथे करण्‍यात आला. या वॉटर टॅक्‍सी सेवेमुळे एकूण २०० प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतात. या सेवेमुळे मुंबईला ५५ मिनिटांमध्‍ये पोचता येणार आहे.

भुसे म्‍हणाले की, नवी मुंबई, ठाणे येथील प्रवाशांना मुंबईत रस्‍त्‍याच्‍या मार्गाने जातांना पुष्‍कळ वेळ जातो, तसेच वाहतुकीची कोंडी होते. रस्‍ते मार्गावरील ताण अल्‍प करण्‍यासाठी ही वॉटर टॅक्‍सी सेवा उपयुक्‍त ठरणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन यांची बचत होऊन वाहनांचे प्रदूषण अल्‍प होणार आहे. भविष्‍यात महाराष्‍ट्राला लाभलेल्‍या सागरी किनार्‍याचा वापर करून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, पालघर ही शहरे जलमार्गाने जोडण्‍यात येणार आहेत.