(म्हणे) ‘योगी आदित्यनाथ धर्मगुरु नव्हे, तर ठग !’ – राहुल गांधी, काँग्रेस

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला !

डावीकडून काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

नवी देहली – उत्तरप्रदेशात कुणीही हिंसाचाराला प्रोत्साहन देत नाही; पण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या भाषेमुळे धर्मगुरु म्हणता येत नाही. केवळ भगवा घातल्यामुळे कुणी धर्मगुरु होत नाही. क्षमा करा; पण योगी आदित्यनाथ कोणतेही धार्मिक नेते म्हणजे धर्मगुरु नाहीत. ते एक सामान्य ठग आहेत. भाजप उत्तरप्रदेशात अधर्माचा प्रचार-प्रसार करत आहे, अशी गरळओक काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर केली. येथील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये झालेल्या सामाजिक संघटनांच्या बैठकीत त्यांनी हे विधान केले. या बैठकीत ‘स्वराज इंडिया’चे प्रमुख योगेंद्र यादव हेही उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या मुलाखतीत ‘विरोधी पक्षांचे राहुल गांधी यांच्यासारखे नेते भाजपचे काम सोपे करतात. ते खरेच भाजपसाठी पोषक वातावरण निर्माण करतात. काँग्रेस वर्ष १९४७ पासून देशात जात आणि धर्म यांच्या नावाने फूट पाडत आहे’, असे म्हटले होते. त्यावरून राहुल गांधी यांनी वरील टीका केली.

(सौजन्य : Navbharat Times नवभारत टाइम्स)

राहुल गांधी पुढे म्हणाले की, उत्तरप्रदेशात धर्माचे वादळ नाही. मी इस्लाम वाचला. ख्रिस्ती धर्मही वाचला. बौद्ध धर्माचाही अभ्यास केला. हिंदु धर्माचीही मला जवळून जाण आहे. कोणताही धर्म हिंसाचार पसरवण्याचा उपदेश करत नाही. एखाद्याची तपश्चर्या बंद केली की, तो संभ्रमाच्या स्थितीत पोचतो. काँग्रेस तपस्वींचा पक्ष आहे. भाजप आणि संघ याउलट आहे.

राहुल गांधी अल्प बुद्धीचे ! – महंत राजू दास

महंत राजू दास

अयोध्येतील हनुमानगढीचे महंत राजू दास यांनी राहुल गांधी यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, ज्या पीठाने (गोरखनाथ पीठाने) देशाला ३ वेळा खासदार दिले, त्या पीठाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे प्रमुख आहेत. त्यांना ठग म्हणणारे राहुल गांधी यांच्यापेक्षा अल्प बुद्धीचा कुणी असू शकत नाही.

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील रामललाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे योगी आणि साधक आहेत. ते समाजासाठी काम करत आहेत. त्यामुळेच जनतेने त्यांना दुसर्‍यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडून दिले आहे. त्यांच्यावर आरोप करणे अयोग्य आहे.

संपादकीय भूमिका 

  • काँग्रेसने तिच्या सत्ताकाळात देशातील जनतेला किती ठकवले, याविषयी राहुल गांधी का बोलत नाहीत ?
  • राहुल गांधी यांना धर्मगुरु काय असतो, हे तरी ठाऊक आहे का ? पाद्री आणि मौलवी यांच्याविषयी असे विधान करण्याचे धाडस राहुल गांधी कधी करू धजावतील का ?