मी अन्वेषण यंत्रणांचा बळी ठरलो ! : हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांची न्यायालयीन निर्णयावर प्रतिक्रिया

मोहसीन शेख हत्या प्रकरण

पुणे – तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने हिंदुत्वनिष्ठ विचारांच्या कार्यकर्त्यांना मोहसीन शेख हत्या प्रकरणात लक्ष्य केले. पोलिसांना तशा सूचनाच दिल्या.  त्यामुळे मोहसीन शेख हत्या प्रकरणात मी अन्वेषण यंत्रणांचा बळी ठरलो, अशी प्रतिक्रिया हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली. (असे असेल, तर सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चौकशी करणार का ? – संपादक) मोहसीन शेख हत्या प्रकरणात हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांच्यासह २१ जणांची विशेष न्यायाधीश एस्.बी. साळुंखे यांनी सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. त्यानंतर देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली.

धनंजय देसाई यांनी सांगितले की, मोहसीन शेख याची हत्या हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा ठपका ठेवला होता. न्यायालयाने माझ्यासह कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केल्याने समाधान वाटते. शेख याची हत्या जमावाने केली. माझ्यासह कार्यकर्त्यांना शेख याच्या हत्या प्रकरणात गोवण्यात आले होते. पोलिसांनी शेख याच्या मारेकर्‍यांना शोधायला हवे. मी निर्दोष होतो. न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी आमची मुक्तता केली. (निष्पापांची निर्दोष मुक्तता झाली; पण कारावासात त्यांची जी वर्षे वाया गेली, त्यांचे काय ? आरोपी आणि त्यांचे नातेवाईक यांना या काळात जे भोगावे लागले, त्याची हानी भरपाई कशी होणार ? – संपादक) खटल्याचे कामकाज चालू असतांना एकाही साक्षीदाराने आम्हाला ओळखले नाही. हिंदु राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते फक्त हडपसर भागात नसून संपूर्ण देशभरात आहेत.

संपादकीय भूमिका

  • अन्वेषण यंत्रणेवर असा ठपका येणे, हे गंभीर आणि लज्जास्पद आहे. यामध्ये सरकारने लक्ष घालणे अपेक्षित आहे.
  • ९ वर्षांनंतर मिळणारा न्याय हा अन्यायच आहे, असे कुणाच्या मनात आले, तर त्यात चुकीचे काय ? सरकारने न्याययंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.