(म्‍हणे) ‘राज्‍यात धर्मांतर चालू असल्‍याचे सिद्ध केल्‍यास राजकारण सोडीन, अन्‍यथा पांडित्‍य सोडा !’ – काँग्रेसचे मंत्री कवासी लखमा

छत्तीसगडमधील काँग्रेसचे मंत्री कवासी लखमा यांचे बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांना आव्‍हान !

बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री आणि काँग्रेसचे मंत्री कवासी लखमा

रायपूर (छत्तीसगड) – राज्‍यात कुठेही धर्मांतराच्‍या घटनांत वाढ झालेली नाही. बागेश्‍वरच्‍या शास्‍त्रींनी त्‍यांचे आरोप सिद्ध केले, तर मी राजकारण सोडीन; पण त्‍यांना स्‍वतःचे आरोप सिद्ध करता आले नाहीत, तर त्‍यांना त्‍यांचे पांडित्‍य सोडावे लागेल, असे आव्‍हान छत्तीसगडचे उत्‍पादन शुल्‍क मंत्री आणि काँग्रेसचे नेते कवासी लखमा यांनी राज्‍यातील बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्‍णशास्‍त्री यांना दिले. पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री सध्‍या रायपूरमध्‍ये रामकथा सांगण्‍यासाठी आले आहेत. त्‍यांचा एक व्‍हिडिओ प्रसारित झाला आहे. त्‍यात ते छत्तीसगडमध्‍ये धर्मांतराच्‍या घटनांत वाढ झाल्‍याचा दावा करतांना दिसत आहेत. यावरून कवासी लखमा यांनी हे आव्‍हान दिले आहे.

पंडित धीरेंद्र शास्‍त्री यांनी येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले होते की, मी धर्मांतराच्‍या घटना रोखण्‍यासाठी जागोजागी रामकथांचे कार्यक्रम आयोजित करत आहे. ख्रिस्‍ती मिशनरी भोळ्‍याभाबड्या हिंदूंना जाळ्‍यात ओढून त्‍यांचे धर्मांतर करत आहेत. त्‍यामुळे मी हिंदूंमध्‍ये जाऊन रामकथांचे कार्यक्रम करण्‍याचा संकल्‍प घेतला आहे. या अंतर्गत अनेक लोकांना पुन्‍हा हिंदु धर्मात घेण्‍यात आले आहे. (धर्मांतरित हिंदूंना पुन्‍हा हिंदु धर्मात घेण्‍याचे कार्य करणारे पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांच्‍याप्रती हिंदूंनी कृतज्ञताच व्‍यक्‍त केली पाहिजे ! मुळात स्‍वातंत्र्यानंतरच सरकारी स्‍तरावरूनच जे हिंदू आमिषामुळे किंवा बलपूर्वक धर्मांतरित झाले आहेत, त्‍यांना पुन्‍हा हिंदु धर्मात आणण्‍यासाठी योजना राबवणे आवश्‍यक होते. हिंदु राष्‍ट्रात असा प्रयत्न केला जाईल ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • छत्तीसगडच नव्‍हे, तर संपूर्ण देशातच ख्रिस्‍ती मिशनर्‍यांकडून भोळ्‍याभाबड्या हिंदूंचे आमीष दाखवून धर्मांतर करण्‍याचे कृत्‍य वर्षानुवर्षे चालू आहे. हे जगजाहीर असतांना काँग्रेसचे मंत्री मिशनर्‍यांना पाठीशी घालण्‍याचाच प्रयत्न करत आहेत, हेच स्‍पष्‍ट होते !
  • अशा राजकारण्‍यांमुळेच देशात हिंदूंचे धर्मांतर होत आहे. हे रोखण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्राला पर्याय नाही !