कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा ! – महाविकास आघाडीच्या आमदारांची मागणी

महाविकास आघाडीच्या आमदारांचे विधानभवन परिसरात आंदोलन !

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर भूमी घोटाळ्याचे आरोप – ‘या प्रकरणी सत्तार यांनी त्यागपत्र द्यावे’, अशी मागणी

नागपूर, २६ डिसेंबर (वार्ता.) – विधानसभा आणि विधान परिषद येथे २६ डिसेंबर या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार अन् विधान परिषदेत अनिल परब यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर भूमी घोटाळ्याचे आरोप केले. ‘या प्रकरणी सत्तार यांनी त्यागपत्र द्यावे’, अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी करून विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. या वेळी ‘राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा’, अशी जोरदार घोषणा दिली, तसेच ‘बेळगाव, कारवार आणि निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, अशी मागणीही विरोधकांनी घोषणा देतांना केली.

नेमके प्रकरण काय ?

कृषीमंत्री अब्दुल सत्तार

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश खुंटीला टांगून अब्दुल सत्तार यांनी मौजे गोडबाभूळ (जिल्हा वाशिम) येथील गट क्रमांक ४४ मधील ३७ एकर १९ गुंठे सरकारी गायरान भूमीचे एका व्यक्तीला वाटप केले आहे. या भूमीची किंमत साधारणतः १५० कोटी रुपये आहे. जिल्हाधिकार्‍यांनीही याविषयी ५ जुलै २०२२ ला महसूलच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना अवैध पत्र लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठानेही या प्रकरणी ताशेरे ओढले आहेत.