आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत ! – अमिताभ बच्चन

कोलकाता (बंगाल) – देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटली आहेत; मात्र आजही नागरिकांच्या स्वातंत्र्याविषयी, तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत, असे विधान अभिनेते अमिताभ बच्चन यांनी येथे आयेजित ‘कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त केले. या वेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अभिनेते शाहरुख खान, जया बच्चन आदी उपस्थित होते. ‘आपण प्रेक्षकांना कमी लेखू नये. प्रेक्षकांकडे सर्व प्रकारचा आशय आहे. तो कुठे बघायचा ही त्यांची निवड आहे’, असेही बच्चन यांनी सांगितले.

 (सौजन्य : Hindustan Times) 

१. या वेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अमिताभ बच्चन यांच्या बोलण्याचे समर्थन केले. त्या म्हणाल्या, ‘अमिताभ बच्चन यांनी जे सांगितले. त्यासाठी धाडस लागते.’ यासह बॅनर्जी यांनी अमिताभ बच्चन यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याचीही मागणी केली.

२. दुसरीकडे भाजपने अमिताभ बच्चन यांच्यावर टीका केली. भाजपच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, बच्चन यांनी अशा ठिकाणी स्वातंत्र्याविषयी विधान केले, जेथे निवडणुकीनंतर सर्वाधिक रक्तरंजित हिंसाचार झाला आहे.

संपादकीय भूमिका

  • अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असतील, त्यावर प्रश्‍न उपस्थित केले जाणारच ! अभिव्यक्तीचा अर्थ ‘कुणी काहीही केले, तरी ते त्याच्या नावाखाली खपवून घ्यायचे’ असा घेता येणार नाही, हे अमिताभ बच्चन यांनी लक्षात घ्यायला हवे !
  • एक हिंदु म्हणून अमिताभ बच्चन यांनी कधी हिंदूंच्या देवतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली होणार्‍या अवमानविषयी चकार शब्द तरी काढला आहे का ?