नक्षलवादी चळवळीचे समर्थक कोबाड गांधी यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला राज्यशासनाचा अनुवादाचा पुरस्कार !

मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून चौकशीचे आदेश !

नागपूर – नक्षलवादी चळवळीचे समर्थक समजले जाणारे कोबाड गांधी यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला राज्यशासनाचा अनुवादासाठीचा ‘यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार’ मिळाला आहे. यावरून समाजातून संताप व्यक्त केला जात आहे. मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

कोबाड गांधी हे नक्षलवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते मानले जातात. कोबाड गांधी हे कानू सन्याल यांच्यानंतर नक्षलवादी गटांना वैचारिक खतपाणी देणारे आणि स्वतःचे आयुष्य नक्षलवाद्यांसाठी समर्पित केलेले नेते म्हणून ओळखले जातात. या पुस्तकाला पुरस्कार मिळाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. वर्ष २०२०-२१ वर्षीचे हे पुरस्कार आहेत. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक अशोक पंडित अन् लेखक रतन शारदा यांनी ट्वीट करत यावर आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

माओवाद्यांच्या उच्चाधिकार समितीचे सदस्य !

कोबाड गांधी हे माओवाद्यांच्या उच्चाधिकार समितीचे (‘पॉलिट ब्युरो’चे) सदस्यही आहेत. देशात नक्षलवादी जाळे पसरवण्याच्या आरोपाखाली कोबाड गांधी यांना देहली पोलिसांनी वर्ष २००९ मध्ये अटक केली होती. त्यांनी देहली, आंध्रप्रदेश आणि देशातील इतर अनेक कारागृहांत माओवादी कारवायांच्या आरोपाखाली एक दशक घालवले आहे. वर्ष २००९ मध्ये जेव्हा त्यांना प्रथम अटक करण्यात आली, तेव्हा त्यांच्यावर ‘ज्येष्ठ माओवादी नेता’ असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. आता न्यायालयाने त्यांना या आरोपातून निर्दोषमुक्त केले आहे.

चौकशी अहवालानंतर कारवाई !

मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले, ‘‘या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल आल्यानंतर त्यानुसार योग्य निर्णय घेऊ. पुरस्कार देण्यासाठी निवड समिती स्थापन केली जाते. ही समिती पुस्तकातील माहिती पडताळून घेते. पुस्तकात काही आक्षेपार्ह माहिती असल्यास समितीने ही गोष्ट माझ्या निदर्शनास आणून द्यायला हवी होती. येथे तसे झालेले नाही.’’

नक्षली विचारांचे उदात्तीकरण अमान्य !

दीपक केसरकर म्हणाले, ‘‘कोबाड गांधी यांच्या आत्मचरित्राच्या अनुवादाला पुरस्कार दिला गेला, ही गोष्ट अतिशय संवेदनशील आहे. विचारस्वातंत्र्य प्रत्येकाला असते. असे असले, तरी नक्षली विचारांचे उदात्तीकरण होणे आमच्या सरकारला मान्य नाही. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे. त्यामुळे काही चुकीचे असल्यास कारवाई केली जाईल.’’

संपादकीय भूमिका

  • सातत्याने नक्षलवादी आणि माओवादी यांच्याकडून जनता, पोलीस अन् सैनिक यांच्या हत्या, तसेच शासकीय कार्यालयांची हानी होत असतांना नक्षलवाद्यांचे समर्थक कोबाड गांधी यांना पुरस्कार देणे हे लज्जास्पद आहे. पुरस्कार देणार्‍या संबंधित दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी !
  • नक्षलवादी नेत्यांचा असा उदोउदो होत असल्याने सरकारने संपूर्ण नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने ठोस कृती करावी !
  • कित्येक दशकांपासून चालू असलेला माओवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयश !