श्री गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रम स्थगित करण्यासाठी पुणे विद्यापिठातील प्राध्यापकांचे कुलगुरूंना निवेदन !

विद्यापिठाकडून अभ्यासक्रमात पालट करण्याची सिद्धता

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील संस्कृत-प्राकृत विभाग, लोकमान्य टिळक महाविद्यालय, संस्कृत विभाग आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे यांच्या वतीने ‘व्यक्तीमत्त्व विकासाचा आलेख – मन:शांतीचा राजमार्ग श्री गणेश अथर्वशीर्ष’ हा एक श्रेयांकाचा ऑनलाईन अभ्यासक्रम चालू करण्यात आला आहे; मात्र श्री गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमाची तज्ञांकडून चौकशी करण्याची आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत अभ्यासक्रम स्थगित करण्याची मागणी विद्यापिठातील प्राध्यापकांकडून करण्यात आली आहे. (पाश्‍चात्त्य देशांना जे समजते, ते भारतात राहूनही भारतियांना न समजणे दुर्दैवी आहे ! ‘ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते’, असे उपनिषद म्हणजे श्री गणेश अथर्वशीर्ष होय. त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध न करता याचे लाभही लक्षात घ्यावेत ! – संपादक) ज्येष्ठ अभ्यासकांसह विद्यापिठाच्या विविध विभागांतील २५ हून अधिक प्राध्यापकांनी अभ्यासक्रमाविषयी आक्षेप नोंदवणारे संयुक्त निवेदन कुलगुरूंना दिले आहे. या अभ्यासक्रमावर टीका करण्यात आल्यानंतर विद्यापिठाने अभ्यासकांना अभ्यासक्रमाविषयी सूचना करण्याचे आवाहन करत अभ्यासक्रमात पालट करण्याची सिद्धता दर्शवली आहे.

१. या पार्श्‍वभूमीवर विद्यापिठातील प्राध्यापकांनी अभ्यासक्रमाविषयी काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. अभ्यासक्रमाला मान्यता देतांना या विषयाची चर्चा संबंधित विषयतज्ञांचा समावेश असलेल्या विद्याशाखा, विद्या परिषद या महत्त्वाच्या अधिकार मंडळांमध्ये झाली नाही. तसेच अशा प्रकारचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याने निश्‍चित मन:शांती मिळते आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, हे कोणत्या ठोस वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे निश्‍चित केले, हे स्पष्ट होत नाही. (मन:शांती मिळवून देणारे ‘अध्यात्म’ हेच एकमेव शास्त्र आहे, हे पटल्यामुळे विज्ञाननिष्ठ समजले जाणारे पाश्‍चात्त्य मन:शांतीसाठी हिंदु संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत. निवळ हिंदुद्वेषापायी ही प्राध्यापक मंडळी हा अभ्यासक्रम रहित करण्याचा प्रयत्न करत आहेत ! – संपादक) अशी काही सूत्रे निवेदनात नमूद करण्यात आली आहेत. तसेच या सूत्रांंविषयी तज्ञांकडून चौकशी करून ती सार्वजनिक करण्याची, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत अभ्यासक्रमास स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली.

२. अभ्यासक्रमाच्या माहितीपत्रकात सांगितल्याप्रमाणे ‘अशिष्य व्यक्तीला अथर्वशीर्ष शिकवले असता पाप लागते, आठ ब्राह्मणांना स्तोत्र शिकवावे म्हणजे हा अभ्यासक्रम पूर्ण करणारा अथर्व होतो’, अशी विधाने केली आहेत. अशा विधानांद्वारे समाजात विषमतेचा पुरस्कार आणि अंधश्रद्धांचा प्रसार केला जात आहे, त्याला समाजमान्यता मिळवण्याचा प्रयत्न होत आहे, हे योग्य नाही’, असे निवेदनात नमूद केलेले आहे.

संपादकीय भूमिका

  • पुणे विद्यापीठ हे महाराष्ट्रातील ‘जवाहरलाल नेहरून विश्‍वविद्यालय’ बनत चालल्याचे हे द्योतक होय. हे विश्‍वविद्यालय हिंदुद्वेषी कारवाया अड्डा बनण्याआधी महाराष्ट्रातील समस्त हिंदुत्वनिष्ठ बुद्धीजीवी आणि विचारवंत यांनी याचा वैचारिक स्तरावर विरोध करणे आवश्यक !
  • ‘युनेस्को’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने जागतिक अभ्यासक्रमात हिंदु धर्मातील तत्त्वे दर्शित करणारी काव्ये स्वीकारली आहेत. अमेरिका आणि युरोपीय देशांतील शिक्षणव्यवस्थेत संस्कृत भाषा अन् रामकृष्णादी अवतारांच्या कथांचे धडे अंतर्भूत आहेत. अमेरिकेच्या विद्यापिठात भगवद्गीतेचा अभ्यास सक्तीचा करण्यात आला आहे. असे असतांना भारतातच अथर्वशीर्षाला विरोध का ?